नवी दिल्ली – दक्षिण अफ्रिकेत सर्वात प्रथम आढळलेल्या ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या रूपाचा परिणाम डिसेंबरअखेर दिसून येण्याची शक्यता असून, देशात कोरोनाची तिसरी लाट जवळपास निश्चित मानली जात आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तिसरी लाट दुसर्या लाटेहून कमी घातक असेल, असा दावा आयआयटीचे वरिष्ठ शास्त्रत्र पद्मश्री प्रा. मणिंद्र अग्रवाल यांनी नव्या संशोधनात केला आहे.
प्रा. अग्रवाल यांनी आपल्या गणितीय मॉडेल सूत्रांच्या आधारावर हा निष्कर्ष काढला आहे. या आधारावरून प्रा. अग्रवाल यांनी दुसर्या लाटेनंतर नव्या म्युटेंटमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली होती. प्रा. अग्रवाल यांनी दक्षिण अफ्रिकेत प्रसार झालेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटवर संशोधन करून प्रारंभिक निष्कर्ष काढला आहे.
आतापर्यंत जितके प्रकरणांचे संशोधन समोर आले आहे, त्यामध्ये संसर्ग वेगाने पसरत आहे, परंतु तो अत्याधिक घातक नाही असे निदर्शनास आले आहे. सप्टेंबर महिन्यात तिसर्या लाटेसंदर्भात करण्यात आलेले आकलन खरे सिद्ध होत आहे, असे प्रा. अग्रवाल यांनी म्हटले आहे. अनेक देशांमध्ये फैलाव झाल्यानंतर भारतातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळत आहेत. तिसरी लाट परमोच्च बिंदूवर आल्यानंतर दिवसाला एक ते दीड लाख रुग्ण आढळण्याची शक्यता आहे. प्रा. अग्रवाल यांनी आपल्या गणितीय मॉडेल सूत्रांद्वारे पहिल्या आणि दुसर्या लाटेचा अभ्यास केला होता. त्यांच्या संशोधनाचे निष्कर्ष बहुतांश खरे सिद्ध झाले आहेत.
मुलांवर किती परिणाम?
प्रा. अग्रवाल यांच्या माहितीनुसार कोरोनाच्या तिसर्या लाटेचा लहान मुलांवर कमी परिणाम होईल. त्यांच्यात कमी लक्षणे आढळून येतील. यातून मुले लवकरच बरेही होतील. ओमिक्रॉनने संक्रमित रुग्ण लवकर बरे होणार आहेत. त्यांना सामान्य सर्दी-पडशासारखे लक्षणे दिसतील. दुसर्या लाटेप्रमाणे रुग्ण त्रस्त होणार नाहीत. प्रा. अग्रवाल म्हणाले, हा व्हेरिएंट नॅच्युरल इम्युनिटीला जास्त बायपास करत नाहीये. नॅच्युरल इम्युनिटी म्हणजे जे नागरिक एकदा कोरोनाबाधित झालेले आहेत, त्यांना जास्त घाबरण्याची गरज नाही. अशा नागरिकांना संसर्ग होऊ शकतो. पण त्यांना जास्त त्रास होणार नाही.
लसीकरण आवश्यक
प्रा. अग्रवाल यांच्या माहितीनुसार, कोरोनाच्या तिसर्या लाटेतून बचाव करण्यासाठी सतर्कता बाळगणे आणि लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. ज्या नागरिकांनी लशीचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेला नाहीय, त्यांनी त्वरित घ्यायला हवा. मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणेही आवश्यक आहे.
अंशतः लॉकाडाउन शक्य
प्रा. अग्रवाल सांगतात, कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पूर्ण लॉकडाउन लावण्याची गरज नाही. सतर्गकता बाळगून संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली तरी खूप झाले. आवश्यकता भासल्यास अंशतः लॉकडाउन लावला जाण्याची शक्यता आहे.