विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
देशभरात अनेक राज्यात कोरोनाचे संकट कमी जास्त होत असतानाच आता निपाह विषाणूचा धोका निर्माण झाला असून केरळमध्ये या विषाणूमुळे १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरात भीतीचे वातावरण पसरले असून देशभरातील वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोग्य संघटनांचे याकडे लक्ष वेधले आहे.केरळ राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता निपाह विषाणूने या राज्यात शिरकाव केला आहे, निपाह विषाणूमुळे एका बालकाचा मृत्यू झाला आहे, या घटनेची गंभीर पणे दखल घेत केंद्र सरकारने तांत्रिक मदतीसाठी आपली एक टीम केरळला पाठवली आहे. केरळमध्ये कोझिकोड जिल्ह्यात दि. ३ सप्टेंबर रोजी निपाह विषाणूचा संशयित रुग्णाची नोंद करण्यात आली होती, यात १२ वर्षांच्या मुलामध्ये एन्सेफलायटीस आणि मायोकार्डिटिसची लक्षणे आढळली होती. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरु असतानाच आज ५ सप्टेंबर रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ( एनसीडीसी) कडून राज्याला तांत्रिक सहाय्य देण्यासाठी पाठवले आहे. तर दुसरीकडे निपाह संक्रमणाची संशयित माहिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने शनिवार दि. ४ रोजी रात्री उशिरा आरोग्य अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने (एनआयव्ही) मुलाचे तिन्ही नमुने निपाह व्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. मुलाला काही दिवसांपूर्वी उच्च ताप आल्याच्या तक्रारींसह एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, नंतर पुढील चाचण्यांसाठी नमुना एनआयव्हीकडे नेण्यात आला. या घटनेनंतर आरोग्यविषयक काळजी म्हणून मुलाचे सर्व नातेवाईक आणि त्याच्या उपचारात सहभागी असलेल्या सर्वांना स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. तसेच १७ नमुने चाचणीसाठी पाठवले आहेत. राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, निपाह विषाणू हा वटवाघळांपासून पसरला असावा, कारण या पूर्वी देखील राज्यात असे प्रकार घडले होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत केंद्र सरकारने तात्काळ योग्य पावले उचलण्याची सूचनाही केली आहे. सहाजिकच केंद्राच्या सूचनेनुसार राज्याने संशयित कुटुंब, संबंधित गावात विशेषत: मलप्पुरम मध्ये सक्रिय प्रकरणांचा शोध, गेल्या १५ दिवसात मुलाच्या संपर्कात आलेल्या लोकांचा सक्रिय संपर्क शोध, लोकांना संपर्कात ठेवणे आणि इतर संशयितांना विलगीकरणात ठेवणे यांचा समावेश आहे. तसेच तपासणीसाठी नमुना चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यास सांगितले आहे. वैद्यकिय तज्ज्ञांच्या मते, निपाह विषाणू प्रामुख्याने वटवाघळांद्वारे पसरतो. वटवाघळे फळे खातात आणि त्यांची लाळ फळावर सोडतात. अशी फळे खाणारे प्राणी किंवा मानव निपाह व्हायरसने संक्रमित होतात.