इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अनेक बदल करण्यात आले आहेत. आता या बदलांची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू झाली आहे. दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा शालेय शिक्षणाचा एक एक टप्पा पूर्ण करायच्या. आता मात्र हे टप्पे बदलले जाणार आहेत. नव्या धोरणानुसार पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी व नववी ते बारावी याप्रमाणे टप्पे केले जाणार आहेत. आणि त्याची अंमलबजावणी याच शैक्षणिक वर्षापासून होण्याची दाट चिन्हे आहेत. त्यादृष्टीने सरकारी पातळीवर तयारी सुरू झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणाविषयी शैक्षणिक वर्तुळात चर्चा आहे. या धोरणातील बदलांवर वेगवेगळी मते मांडली जात आहेत. वेगवेगळ्या शिक्षणतज्ज्ञांकडूनही या धोरणातील कोणत्या बाबी चांगल्या वाटल्या तसेच कोणत्या घटकांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, याविषयीची माहिती मागवण्यात आली होती. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्याचा अवलंब करण्याचा, हे धोरण प्रत्यक्षात आणण्याची तयारी वेगात सुरू झाली आहे.
पाच अधिक तीन अधिक चार यानुसार हे टप्पे असणार आहेत. पायाभूत, प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक वर्ग याप्रमाणे हे टप्पे मानले जातील. यातील नववी ते बारावीचा टप्पा साहजिकच शालेय जीवनातला सर्वात महत्त्वाचा विभाग असणार आहे. या नवीन टप्प्यानुसार शाळांमध्ये तसेच शिक्षण पद्धतीत नवीन बदल केले जाणार आहेत. दहावीपर्यंत शाळा व अकरावीपासून कॉलेज अशी पद्धत आपल्याकडे होती. आता ती किमान बारावीपर्यंत शालेय टप्प्यातच समाविष्ट असणार आहे.
या नवीन धोरणामुळे शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करणे या पद्धतीलाही चाप बसणार असून, विद्यार्थ्यांना समाविष्ट होता येईल, अशा अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे. यात वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार, समस्यांचे निराकरण, सहकार्य, डिजिटल शिक्षण आदी विषयांचा समावेशदेखील असणार आहे. हे विषय विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार समजावे यासाठी इयत्ता आणि विद्यार्थ्याचे वय याची योग्य सांगड घातली गेली आहे. म्हणूनच पाच अधिक तीन अधिक चार, अशी रचना त्यानुसार करण्यात आली आहे.