इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चीनमध्ये बनवलेले फोन जगभरामध्ये वापरले जातात. भारतात टॉप ५ कंपन्यांमध्ये सॅमसंग कंपनी सोडली तर अन्य चार कंपन्या या चीनी आहेत. इतका प्रभाव चीनी मोबाईलचा आपल्या देशात आहे. असे असले तरी चीनच्या लोकांनाच आता चीनमध्ये बनवलेले मोबाइल फोन नकोसे झाले आहेत. त्यांच्या स्थानिक कंपन्यांमध्येच ग्राहकांना आकर्षित करण्याची स्पर्धा लागली आहे.
चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी काही बाबतीत आजही आपल्याकडे पर्याय नाहीत किंवा अत्यंत कमी पर्याय आहेत. कमी पैशात चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी तर चीनी वस्तूंकडेच कल आत्ताही असतोच. मोबाईलचे तसेच आहे. म्हणून तर भारतात दर दहा मोबाइल विक्रीमागे आठ मोबाइल चीनी कंपन्यांचे आहेत. विवो, ओप्पो, वन प्लस, शायोमी अशा अनेक कंपन्यांना त्यात समावेश आहे. असे असले तरी, चीनी लोकांना मात्र आता या कंपन्या भुरळ घालत नाही. ते आता स्थानिक कंपन्यांपेक्षा एपल कंपनीच्या आयफोनला सर्वाधिक पसंती देत आहेत.
सध्याची चीनमधील परिस्थिती अशी आहे की, एपल हा ब्रॅण्ड स्मार्टफोन विक्रीच्या बाबतीत चीनमध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे. सलग आठ आठवड्यांपासून टॉप स्मार्टफोन ब्रॅण्ड म्हणून एपल कंपनी चीनमध्ये घोषित केली जात आहे. आयफोन १३ सिरीज लाँच झाल्यापासून ही पसंती मिळते आहे. एपल या ब्रॅण्डचे स्मार्टफोन गुणवत्तेच्या बाबतीत सर्वात चांगले आहेत.
याबरोबरच, आयफोन १३चा कॅमेरा, ५जी कनेक्टीव्हीटी हेदेखील चीनी नागरिकांना आकर्षित करत आहेत. आयफोन १३ प्रो मॅक्स, आयफोन १३ प्रो, आयफोन १२ सिरीज या स्मार्टफोन्सला सर्वाधिक पसंती आहे. चीनमधील विवो या कंपनीच्या स्मार्ट फोनला चीनी नागरिकांची पसंती होती. आता या कंपनीलाहीशी एपल कंपनीशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे चीनमध्ये बनवलेले मोबाइल चीनच्या तुलनेत इतर देशांमध्येच, भारतामध्येच अधिक खपत असल्याची स्थिती सध्या आहे.