ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासांत विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल झाल्याने मुंबईसह ठाणे परिसरातील वातावरण तापले होते, कारण भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने ही तक्रार दिल्याने आव्हाड यांच्यावर सदर गुन्हा करण्यात आला होता. मात्र जितेंद्र आव्हाड यांना आता या विनयभंगाच्या आरोपाप्रकरणी दिलासा मिळाला आहे, ठाणे सत्र न्यायालयाने या गुन्ह्याप्रकरणी आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला असून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर आणि पोलिसांना तपासासाठी सहकार्य करण्याच्या अटीवर हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. आव्हाड यांच्यावर दाखल झालेले गुन्हे चुकीचे असल्याची भावना व्यक्त करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात होती. पोलिसांनी देखील आव्हाड यांना पोलीस ठाण्यात बोलून नंतर बेसावधपणे अटक केल्याचे म्हटले जात होते. त्यामुळे आव्हाडांना सहजासहज हा जामीन मंजूर झाला नाही, तर त्यासाठी न्यायालयात त्यांच्या वकिलांना प्रचंड युक्तीवाद करावा लागला. विशेष म्हणजे पोलीसही आव्हाडांच्या जामिनाला विरोध करत होते. त्यामुळे आव्हाडांच्या अडचणी वाढल्या होत्या.
भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने ही तक्रार दिल्याने आव्हाड यांच्यावर गुन्हा करण्यात आला होता, यासंदर्भात आव्हाड म्हणाले की, मला पूर्ण अभ्यास केल्यानंतर लक्षात आले, पूर्ण गर्दीमध्ये एक स्त्री चालत येते. मी खासदार श्रीकांत शिंदे यांना एका बाजूला केले. त्या बाई समोरुन चालत आल्या. मी बाजूला केले नसते तर त्या माझ्या अंगावरच आल्या असत्या. मग मला स्वत:ला सावरण्याची आणि सुरक्षेची कोणतीही संधी मिळाली नसती. मग त्या महिलेने आरोप केला असता की, जितेंद्र आव्हाड स्वत:हून माझ्या अंगावर आले, मात्र एक बरे झाले देवाने मला काय बुद्धी दिली. मी त्यांना हलक्या हाताने सांगितले की, बाजूला व्हा. एवढ्या गर्दीत कशाला जाताय? बाजूला व्हा, हे वाक्य व्हिडीओत ऐकू येत आहे, असे आव्हाड म्हणाले.
आव्हाड पुढे म्हणाले की, इतक्या घाणेरडा किळसवाणा प्रकार, प्लॅनिंग करायचा, त्याला वरुन आशीर्वाद मिळवायचे. हा कहर आहे. इतके बदनामीचे षडयंत्र रचणे आणि एखाद्याला राजकीय आणि सामजिक जीवनामधून उद्ध्वस्त करण्यासाठी कारस्थान रचायचे यामध्ये आनंद कसला?, असा सवाल त्यानी उपस्थित केला. पूर्ण घटना व्हिडीओत आहे. गुन्हा दाखल करण्याआधी तो व्हिडीओ तरी पाहायला होता. कोणतेही कलम दाखल करण्यासाठी काही नियम आहेत. पण काही न वाचता डायरेक्ट गुन्हे दाखल करायचे, मला अटक केली. त्यावर न्यायालयाने जो निकाल दिलाय, अटक करण्याच्या प्रक्रियेतच तुम्ही चुकी केली, असेही आव्हाड म्हटले आहे.
ठाणे सेशन्स न्यायालय सरकारी वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांना जामीन मिळू नये, यासाठी प्रचंड युक्तीवाद केला. वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला त्याप्रकरणी त्यांच्यासाठी काही अटी-शर्ती लागू करण्यात आल्या होत्या. पण त्यांचे पालन आव्हाडांकडून झाले नाही, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी न्यायलयात केला. आव्हाडांच्या अटकपूर्व जामिनाला पोलिसांनी देखील न्यायालयात विरोध केला. या प्रकरणातील आणखी काही फुटेज आणि व्हिडीओ आम्हाला मिळवायचे आहेत. त्यामुळे आव्हाडांना जामीन मिळू नये, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूने युक्तीवाद केला. चव्हाण यांनी सगळे मुद्दे पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काही व्हिडीओदेखील न्यायमूर्तींच्या समोर सादर केले. आव्हाडांनी जाणीवपूर्वक महिलेला धक्का दिलेला नसल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले. संबंधित तक्रारदार महिलेला जितेंद्र आव्हाड बहीण मानतात. मग बहीण मानणाऱ्या महिलेचा ते विनयभंग कसा करतील? असा प्रश्न वकिलांनी न्यायालयात उपस्थित केला. त्यानंतर जामीन मंजूर करताना जितेंद्र आव्हाडांना तपासात पूर्णपणे सहकार्य करण्याची अट न्यायालयाकडून ठेवण्यात आली. तसेच पोलीस जेव्हा बोलावतील तेव्हा आव्हाडांना पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.
NCP MLA Jitendra Awhad Court Bail Hearing