मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सत्तार यांच्या विरध्द राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त करीत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने आज दि. ८ नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीने एका पत्राद्वारे केली आहे. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्याचे विरोधी पक्ष नेते तसेच सुप्रिया सुळे यांचे बंधू अजित पवार यांनी अद्याप प्रतिक्रीया दिलेली नाही. ते कायवर गप्प का आहेत, काय कारण आहे, त्यांनी यावर मौन का पाळले, असा प्रश्न विचारला जात आहे.
राज्यपालांना भेटायला गेलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यासह अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीचे नेते व विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार मात्र याप्रसंगी दिसले नाहीत, विशेषतः आपल्या चुलत भगिनी सुप्रिया यांच्या संदर्भात एका विद्यमान मंत्र्यांने अत्यंत खालच्या पातळीवर वादग्रस्त वक्तव्य करून देखील यासंदर्भात त्यांचे बंधुराज अजित पवार यांनी कोणतीही प्रतिक्रीया व्यक्त केली नसल्याने यासंदर्भात उलट सुलट चर्चा असून वेगवेगळ्या शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत. अजित पवार यांनी या प्रश्री मौन का पाळले असा प्रश्न देखील आता विचारला जात आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे राज्यभरात कालपासून राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या मुंबई व औरंगाबादमधील घरावर धडक देत सोमवारी तीव्र आंदोलन केले, त्यानंतर सत्तार यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला असला तरी राष्ट्रवादी आक्रमक आहे. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच विविध नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. मात्र दिड दिवस उलटूनही अजित पवार यांची काहीच प्रतिक्रिया नाही? हे मौन नेमके का? आणि कशासाठी आहे? केवळ सुप्रिया सुळेंचे दादा (मोठे भाऊ) म्हणूनच नव्हे तर राज्यातील सक्रिय विरोधी पक्षनेते पद असूनही अजित पवार एवढा वेळ शांत का आहेत? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यातच अजित पवार सध्या मुंबईत आहेत. मात्र जयंत पाटील म्हणतात, आजोळी आहेत. परंतु अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना शिवी दिल्यावरून त्यांची एकही प्रतिक्रिया का आली नाही? विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवार गेल्या काही दिवसांपासून शांत आहेत. त्यांच्या मनात काही वेगळेच विचार सुरु आहेत का? अशी चर्चा सुरू आहे.
या संदर्भात मनसेचे संदीप देशपांडेंनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटचीही वारंवार आठवण करून दिली जात आहे, कारण शरद पवार थेट रुग्णालयातून उठून येतात अन् अजित पवार गैरहजर राहतात. गुवाहटीच्या वाटेकडे लक्ष ठेवा, कुछ तो गडबड है… असे वक्तव्य देशपांडेंनी ट्विटरद्वारे केले होते. अजित पवारांचे मौन आणि या चर्चा काही संदर्भ जुळतात का? अशा वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशन प्रसंगी खुद्द शरद पवार आजारी असतानाही उपस्थित राहिले त्यावेळी अजित पवार यांची गैरहजेरी सर्वांनाच खटकली होती आता पुन्हा त्यांचे मन नेमके काय सांगते याची चर्चा सुरू झाली आहे.
NCP Ajit Pawar Silence on Minister Abdul Sattar Statement on Supriya Sule