मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वारंवार ५० खोके घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांवर होत आहे. यामुळे बदनामी होत आहे. ५० खोके घेतल्याचे पुरावे त्यांनी कोर्टात सादर करावेत. अन्यथा २५०० कोटींच्या अब्रु नुकसानीच्या दाव्याच्या नोटीसा दिल्या जातील. यासंदर्भात आता खटला दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तशी माहिती शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली आहे.
राज्यातील राजकारण गेल्या ६० वर्षात कधी नव्हे, पण आता मात्र इतके गढूळ आणि अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले आहे, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना झालेली दिसून येते. याला कारण म्हणजे गेल्या चार-पाच महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात ज्या काही घडामोडी घडत आहेत, आणि त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते वेगवेगळी वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. इतकेच नव्हे तर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर चिखल फेक करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे काय होणार? आणि राज्याला हे नेते कोठे घेऊन जाणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे असे म्हटले जाते.
राजकारणातील आरोप प्रत्यारोपात एक अंक संपत नाही तोच दुसरा सुरू होत आहे सध्या देखील अशाच प्रकारे एक प्रकरण पेटले आहे ते म्हणजे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गटावर ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी त्या बंडखोर आमदारांनी ५० खोके म्हणजे कोट्यावधी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. या आरोपाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी असा आरोप केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी त्याला उत्तर दिले, पुन्हा सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले.
अब्दुल सत्तार यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात एक वक्तव्य केल्याने गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आंदोलन करीत सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने देखील आता आवाज उठवत शिंदे गटावर खोके घेण्याच्या आरोपाबद्दल संबंधित नेत्यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हे प्रकरण संपण्या ऐवजी चांगलेच पेटले आहे असे दिसून येते.
वारंवार ५० खोके घेतल्याचा आरोप करत बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातूनच संयम सुटल्यानेच अब्दुल सत्तार यांचे स्लीप ऑफ टंग झाले, असे शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी म्हटले. तसेच, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी अशी बदनामी केल्यामुळे, त्यांनी कोर्टात ५० खोके घेतल्याचे पुरावे सादर करावेत. अन्यथा २५०० कोटींच्या अब्रु नुकसानीच्या दाव्याच्या नोटीसा दिल्या जातील, असे शिवतारे यांनी स्पष्ट केले. कारण खासदार सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर ५० खोक्यांवरुन टीका केली होती, या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिली. यावरुन राज्यात सत्तार यांच्यावर टिकेची झोड उठल्यानंतर शिंदे गटानेही हे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यासोबतच महाविकास आघाडीतील नेत्यांना इशाराही दिला आहे.
विजय शिवतारे म्हणाले की, शिंदे गटाच्या नेत्यांवर होत असलेल्या ५० खोक्यांच्या टिकेवरुन बोलताना सुप्रिया सुळेंनी शिंदे गटातील नेत्यांना एकप्रकारे सल्लाच दिला होता. माझ्याबाबत असा प्रकार घडला असता तर मी गुन्हा दाखल केला असता, न्यायालयात गेले असते, असे सुळे यांनी म्हटले. त्यानंतर, आम्ही सुप्रिया सुळेंचा सल्ला ऐकला आहे. यापूर्वी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी वारंवार ५० खोके घेतल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे, शिवसेनेचे ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार अशा एकूण ५० आमदारांच्यावतीने या तिन्ही नेत्यांविरुद्ध २५०० कोटींचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहोत, तसेच या तिन्ही नेत्यांनी एकतर नेत्यांची बदनामी केली म्हणून जाहीरपणे माफी मागावी अन्यथा बदनामीच्या खटल्याला कायदेशीर मार्गाने सामोरे जावे, बदनामीचा खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे शिवतारे यांनी म्हटले आहे.
Aditya Thackeray Shinde Group Court Case