नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोकामार्ग भागात हॉटेलमधील वाद मिटविल्याने टोळक्याने एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत तरूणाच्या डोक्यात दगड टाकत त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. याप्रकरणी चार जणांच्या टोळक्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. तौसिफ पिंजारी आणि आदित्य गायकवाड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून राहूल ब्राम्हणे व ललित शिंदे (रा.सर्व बजरंगवाडी) हे दोघे त्यांचे साथीदार अद्याप फरार आहेत. याप्रकरणी नरेंद्र राजेंद्र खैरनार (२३ रा.अमरधामरोड,भद्रकाली) या जखमी युवकाच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खैरनार रविवारी (दि.२५) रात्री अशोकामार्ग भागात गेला होता. राहूल जाधव व सुरज सोनवणे या मित्रांसमवेत तो गणेशबाबारोडवरील कार्तिकी टी स्टॉल भागात उभा असतांना ही घटना घडली. तिघे मित्र गप्पा मारत असतांना संशयित टोळक्याने त्यांना गाठले. रोहित म्हस्के या मित्रासमवेत हॉटेलमध्ये झालेला वाद का मिटवला या कारणातून संशयित ब्राम्हणे याने खैरनार यांच्याशी वाद घातला. या वेळी टोळक्याने शिवीगाळ करीत खैरनार यास लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी संतप्त ब्राम्हणे याने खैरनार यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले तसेच जीवे मारण्याच्या हेतूने धारदारदार शस्त्राने त्याच्यावर सपासप वार केले. या घटनेत खैरणार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास निरीक्षक आहिरे करीत आहेत.