नाशिक – टोमॅटो खरेदी करून त्याबदल्यात शेतकऱ्यांना पैसे न दिल्यामुळे आडतदार, व्यापारी दाम्पत्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३५ शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी केले. पण, शेतक-यांना पैसे दिले नाही. ही रक्कम तब्बल ३१ लाख रुपयांची आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी हे टोमॅटो आणले होते. यावेळेस आडतदार, व्यापारी असलेल्या पती-पत्नीने ही फसवणूक केली. या फसवणूक प्रकरणी कर्मचारी रवींद्र बद्रीनाथ तुपे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीत तब्बल ३५ शेतक-यांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
या तक्रारीवरुन संशयित आडतदार पुष्पा विलास शिंदे व विलास बाबुराव शिंदे (रा. दिंडोरी रोड) या दाम्पत्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी ज्ञानेश्वर ढेमसे यांच्यासह इतर ३५ शेतकऱ्यांनी १ ते २३ जुलै या कालावधीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोचा माल विक्रीसाठी आणला होता. त्यावेळी संशयित शिंदे दाम्पत्याने लिलाव पद्धतीने टोमॅटो खरेदी करून त्याबदल्यात शेतकऱ्यांना सुमारे ३१ लाख रुपयांची रक्कम न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बाजार समितीने संशयित शिंदे दाम्पत्याचे परवानेही रद्द केले आहेत. त्यांचे गाळे जप्त करून आठ लाख रुपयांची बँक गॅरंटी जप्त केली आहे.