नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर हे असुरक्षित आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, अवघ्या २४ तासात तब्बल३ हत्यांच्या घटना शहरात घडल्या आहेत. त्यामुळे नाशिक हादरले आहे. याचनिनित्ताने पोलिसांचा कुठलाही वचक राहिला नसल्याची भावना नाशिककरांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, ही गुन्हेगारी कशी रोखणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
तू माझ्या बहिणीशी लग्न करायचे असे सतत का बोलतो, अशी विचारणा करुन मुलीच्या भावाने तरुणाची हत्या केल्याची घटना पंचवटी परिसरात घडली आहे. विकास रमेश नलावडे असे मृत तरुणाचे नाव आहे. तो निलगिरी बाग परिसरात राहत होता. मुलीचा भाऊ अमोल साळवे व त्याच्या दोन साथीदारांनी विकासला अगोदर लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर साळवे याने धारदार शस्त्राने त्याच्या पोटात आणि डोक्यात जबर वार करून त्याची हत्या केली. या घटनेत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नाशिकमध्ये २४ तासात हा तिसरा खूनाचा प्रकार समोर आला आहे. गंगापूर, अंबड व आडगाव पोलिस हद्दीत हे खून झाले आहेत.
बुधवारी रात्री १०.३० वाजता ही घटना निलगिरी बाग परिसरातील बिल्डिंग नंबर ५ समोर असलेल्या मोकळ्या जागेत घडली. येथे संशयित अमोल साळवे याने विशालला विचारणा केली की तू माझ्या बहिणीशी लग्न करायचे असे सतत का बोलतो. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन धारधार शस्त्राने विशालची हत्या केली. या हत्येनंतर गुन्हे शोध पथकाने संशयित अमोल वसंत साळवे यास ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या दोन साथीदारांची नावे घेतली. त्यात मामा सुनील मोरे व दाजी राहुल भीमराव उजगीरे अशी नावे सांगितली आहे. गुन्हे शोध पथकाने सुनील मोरे यास ताब्यात घेतले तर राहुल उजागिरे हा रुग्णांलयामध्ये उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.