नांदगाव – नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील जवान अमोल पाटील यास कर्तव्य बजावत असताना नेपाळ सीमेवर अपघाती वीरमरण. देशात मकर संक्रातीला तीळेचा गोडवा वाटला जात असताना देशाच्या नेपाळ सीमेवर कार्यरत असलेल्या नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील जवानाला अपघातात वीरमरण आले.नेपाळ सिमेवर ११ हजार के.व्ही.विजेच्या तारेच्या धक्क्याने या जवानाचे अपघाती निधन झाले.
अमोल हिम्मतराव पाटील (वय ३०) असे वीरमरण आलेल्या जवानांचे नाव आहे. एस.एस. बी.चे जवान अमोल यांच्या निधनांची बातमी समजताच बोलठाण, घाटमाथा परिसर व नांदगाव तालूक्याचा संक्रातीचा गोडवा शोकसागरात बुडाला आहे. सशस्त्र सीमा बल नेपाळ जवळील विरपूर सीमेवर कार्यरत असलेला अमोल हे सहकारींसोबत सीमेवर तैनात होते. त्याचवेळी सुरू असलेल्या कामात विजेच्या धक्क्याने अमोल यांना वीरमरण आले. या अपघातात अन्य दोन जवानांना देखील वीरमरण आल्याचे समजले.
ऐन तारुण्यात अपघातात जखमी झालेला असतांना देखील केवळ जिद्द आणि चिकाटीमुळे अमोल यांची गेल्या सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा बला मध्ये निवड झाली होती. शहिद अमोल पाटील हे २०१५ मध्ये सशस्त्र सीमा बलाच्या ४५ व्या बटालियन मध्ये आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते. नुकत्याच दिवाळी सणात अमोल पाटील हे बोलठाण येथे सुट्टीवर आले होते. कर्तव्यावर परत जातांना आई व पत्नी आणि आपल्या नऊ महिन्यांची चिमुकलीला तो सोबत घेऊन गेले होते. दरम्यान विरपूर सीमेवर त्यांना वीरमरण आल्याची माहिती त्यांचा बोलठाण येथे असणाऱ्या लहान भावाला मिळाली आहे. वडिलांचे छत्र हरपलेल्या जवान अमोल यांच्या पश्चात पत्नी, नऊ महिन्यांची मुलगी, आई, अविवाहित भाऊ असा परिवार आहे. शहिद जवान अमोल यांचे पार्थिव बोलठाण येथे आणण्यात येणार असून केंद्र व राज्य सरकार यांच्या कोविड नियमांचे आधीन राहून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नांदगावचे तहसीलदार मोरे यांनी दिली.