मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत स्टाफसह बोटीतून मुंबईकडे येण्यासाठी निघाले. पण, भर समुद्रात बोटच बंद पडली आणि सारेच अडकून पडले. बोटीतील सर्वजण चिंतेत असतानाच सोबत असलेल्या पीएच्या प्रसंगावधानाने उदय सामंत यांच्यासह संपूर्ण स्टाफ सुखरूप मुबईला पोहोचले.
हा संपूर्ण थरारक घटनाक्रम शुक्रवारी सायंकाळी मुंबईच्या समुद्रात घडला. सामंत हे अलिबाग येथील कार्यक्रम आटोपून रायगड जिल्ह्यातील मांडवा येथून स्पीड बोटीने मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने निघाले. बोटीने प्रवास करत असताना भर समुद्रातच स्पीड बोट बंद पडली. बोटीची सर्वच यंत्रणा ठप्प झाली होती. बोटीच्या कॅप्टनला मदतीसाठी आपत्कालीन संदेश पाठवणेही शक्य होत नव्हते. लाटांमुळे सामंत यांची बोट भरकटू लागली होती. प्रसंगावधान राखत सामंत यांच्या पीएंनी प्रयत्न सुरू केले. मोबाइलला रेंज नसली तरी ते सातत्याने प्रयत्न करीत होते. अनपेक्षित पणे, काहीशी रेंज मिळाली आणि त्यांनी मदत मागविली.
जीव भांड्यात
काही वेळातच कशीबशी दुसरी बोट आली आणि सामंतांसह त्यांचा संपूर्ण स्टाफ त्यात शिफ्ट झाला. त्यानंतर सर्वजण बोटीतून सुखरूप मुंबईत पोहोचले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. यासोबतच बुडणाऱ्या बोटीलाही वाचवण्यात आले. सध्या या घटनेची आणि पीएंच्या प्रसंगावधानाचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Mumbai Minister Uday Samant Stuck in Sea Boat