मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचा वाघ बाहेर आला, असे म्हणत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आज दि. ९ नोव्हेंबर रोजी मोठा जल्लोष केला, याला कारण म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय आणि प्रवीण राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. पीएमएलए कोर्टाने त्यांना हा जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यासोबतच न्यायालयाने प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर केला आहे.
पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑगस्टमध्ये अटक केली होती. कोर्टाने राऊतांंच्या जामीनाला स्थगिती देण्याची ईडीची मागणी फेटाळून लावत त्यांचा जामीन कायम ठेवला आहे. अवघ्या काही मिनिटात यावर निर्णय देणे चुकीचे असल्याचे मत नोंदवत ईडीची याचिका फेटाळून लावली. न्यायमुर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली. इतकेच नव्हे तर कोर्टाने ईडीला फटकारले असून संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना करण्यात आलेली अटक ही बेकायदेशीर आहे असे म्हटले आहे.
पत्रा चाळ घोटळ्यामध्ये संजय राऊत यांना आरोपी करण्यात आले होते. कोर्टाने पुरवणी आरोपपत्राची दखल घेतली. यामध्ये राऊतचे नाव मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात आरोपी म्हणून घेण्यात आले आहे. त्यानंतर राऊत यांनी जामिनासाठी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) विशेष न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि विकास प्राधिकरणाने (म्हाडा) मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. राकेश कुमार वाधवान, सारंग कुमार वाधवान आणि इतरांविरुद्ध हा खटला होता.
विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत कैद असलेले शिवसेनेते नेते संजय राऊत यांचा विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने मोठा जल्लोष केला आहे. कारण संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटासाठी हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे. विशेष म्हणजे खासदार संजय राऊत यांना मुंबई हायकोर्टानेही दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे ईडीच्या हायकोर्टातील या याचिकेवर उद्या दि. १० नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला पीएमएलएच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाची प्रत आणि संजय राऊत यांच्या जामीनाची सर्व कागदपत्र ऑर्थर रोड तुरुंगाच्या बाहेरील पेटीत टाकण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंतच राऊत ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबईतील पीएमएलए कोर्टाने दि.२ नोव्हेंबर रोजी त्याच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ केली होती. मात्र, न्यायालयाने राऊत यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता, मात्र आज दि.९ नोव्हेंबर रोजी सुनावण्यात येणार होता. त्यानुसार ही सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने म्हटले की, संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांची अटक बेकायदेशीर होती. ईडीने त्यांच्या मर्जीने आरोपी निवडले, असे मत नोंदवत पीएमएलए न्यायालयाने ईडीला अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. तसेच कोर्टाने प्रवीण आणि संजय राऊत यांचा जामीन नाकारला तर सर्वसामान्य माणसांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल, अशीही भूमिका न्यायालयाने घेतली आहे.
महत्वाची बाब म्हणजे संजय राऊत यांच्या जामीन आदेशासाठी न्यायालयाने तब्बल १२२ पानी आदेश काढले. यात न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात ही सर्व निरीक्षण नोंदवली आहेत. कोर्टाने प्रवीण आणि संजय राऊत यांना जामीन देताना ईडीच्या तपासावर उपस्थित केलेले हे प्रश्नचिन्ह आणि हा आदेश म्हणजे त्यांना पुढील काळात क्लीनचिट मिळण्यासाठी मदत होऊ शकते, असे म्हटले जात आहे.
कोर्ट म्हणाले
या प्रकरणी कोर्टाने आणखी म्हटले आहे की, सिव्हिल प्रकरणांना ‘मनी लॉड्ररिंग’चे नाव दिल्याने तसा गुन्हा दाखल होत नाही. यामुळे निष्पाप नागरिकांना त्रास होतो. प्रवीण राऊत यांची अटक ही निव्वळ सिव्हिल प्रकरणात होती, संजय राऊतांचा त्यांच्याशी संबंध नव्हता. या प्रकरणात म्हाडाची भूमिका संशायस्पद आहे आणि ईडीने देखील हे काही ठिकाणी मान्य केले आहे. मात्र या प्रकरणात म्हाडामधील कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे ईडीने रेकॉर्ड केलेल्या स्टेटमेटनुसार राकेश आणि सारंग वाधवान यांची या प्रकरणात मुख्य भूमिका आहे, हे मुख्य आरोपी आहेत, मात्र त्यांना अटक करण्यात आलेली नाही. याचे कारण काय?कोर्टाने ईडी आणि म्हाडाचे म्हणणे मान्य केले तर मर्जीने आरोपी निवडण्याच्या पद्धतीला मान्यता दिल्यासारखे होईल, असे म्हटले. दरम्यान, राऊतांच्या स्वागतासाठी शिवसैनिक आर्थर रोड कारागृहाबाहेर सज्ज झाले होते.
Mumbai High Court on Sanjay Raut Arrest
Bail Plea Shivsena ED Patra Chawl Scam