निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मुदत संपलेल्या ग्रामपंचयतीवर काल परवा प्रशासकराज आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थाचा घटक असलेल्या ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता होती. मात्र, निवडणूक आयोगाने राज्यातील सुमारे 7 हजार 750 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच गावपातळीवरील राजकीय घडामोडीना वेग आला आहे .18 डिसेंबरला या ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया होणार असुन 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार ज्या त्या तालुक्यातील तहसीलदार यांनी 18 नोव्हेंबरला निवडणूक नोटीस प्रसिद्ध करावयाची आहे.तर उमेदवारांचे नामनिर्देश पत्र हे 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. नामनिर्देशन पत्र छाननी 5 डिसेंबरला करण्यात येणार आहे. तर 7 डिसेंबर रोजी नामनिर्देश पत्र माघार व याच दिवशी दुपारी चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बागलाणमध्ये अनेक मोठ्या गावात निवडणुका होणार असल्याने अनेक गावांत ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे.बागलाण मधील 41 ग्रामपंचायत साठी जरी निवडणूक होत असली तरी तालुक्यातील काही प्रमुख गावांमध्ये लक्षवेधी निवडणुका होणार आहेत.यामध्ये प्रामुख्याने तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या डांगसौंदाणे, विरगाव, तळवाडे दिगर, आराई, मोरेनगर, औंदाने, चौगाव, पिंपळकोठे, मुल्हेर जायखेडा, आसखेडा, टेंभे, वटार ,चौंधाने, तिळवण किकवारी आदी गावामधे चुरशीच्या निवडणुका होणार असल्या तरी प्रशासनाला 41 गावाच्या होणाऱ्या या निवडणुकीत अलर्ट राहत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवहान राहणार आहे.
Satana Taluka 41 Grampanchayat Election