सांगली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईलचा वापर गेल्या काही काळापासून प्रचंड वाढला आहे. लहान मुलांमध्येदेखील मोबाईल वापराचे वेड प्रचंड आहे. यावर उपाय शोधत सांगलीतील मोहित्यांचे वडगाव गावाने रोज सायंकाळी दीड तास मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
टीव्ही मालिका आणि समाज माध्यमातील आभासी जगातील चित्रफिती यांमुळे मुलांची अभ्यासातील रुची कमी झाली आहे. ही रुची वाढविण्यासाठी रोज सायंकाळी दीड तास मोबाईल व टीव्ही बंद ठेवण्याचा निर्णय कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगावने घेतला आहे. या निर्णयाची आठवण करून देण्यासाठी मंदिरावर भोंगाही बसविण्यात आला आहे.
कडेगाव तालुक्यातील ३ हजार १०५ लोकसंख्येचे मोहित्यांचे वडगाव ताकारी योजनेमुळे बागायती झाले आहे. हातात उसाचा पैसा आल्याने मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वळली आहेत. याचा परिणाम जिल्हा परिषदेतील शाळेच्या पटसंख्येवर झाला. याचा विचार करण्यासाठी सरपंच विजय मोहिते यांनी १४ ऑगस्ट रोजी महिलांची आमसभा बोलावली. यावेळी महिलांनी मुलांच्या अभ्यासाचा विषय मांडला. यावर विचार करण्याची गरज प्रत्येकाला वाटत होती.
मुले एकतर मोबाईलवर तासन्तास असतात, तर घरात मोक्याच्या वेळी महिला करमणुकीच्या नावावर छोट्या पडद्यावरील आभासी मालिका पाहण्यात गुंतलेल्या असतात, हे समोर आले. यातूनच रोज सायंकाळी सात ते साडेआठ या वेळेत घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याची लगेचच १५ ऑगस्टपासून अंमलबजावणीही करण्याचे निश्चित करण्यात आले. वेळेची आठवण करून देण्यासाठी गावातील मंदिरावर भोंगाही लावण्यात आला.
दीड तास अभ्यासासाठी
या गावामध्ये प्राथमिक शाळेत शिकणारी १३० तर, माध्यमिक शाळेत शिकणारी ४५० मुले आहेत. या मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी अभ्यास करावा यासाठी रोजचा दीड तास निश्चित करण्यात आला आहे. या वेळेत मुले घराबाहेर दिसणार नाहीत याची जबाबदारी जशी पालकांवर आहे, तशीच गावातील अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या वेळेत जर एखादा मुलगा घराबाहेर आढळला तर त्याला अभ्यासाची आठवण करून दिली जाते. यामुळे मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होत आहे.
Mohityanche Vadgaon Village Take Big Decision
Sangli District No TV Child Study