अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात नव्या सहकारी संस्थांची नोंदणी सुरू केली जाणार आहे. नव्या संस्थांना मंत्रालयातून परवानगी दिली जाईल. पण, त्यासाठी भातपच्या स्थानिक जिल्हाध्यक्षांची शिफारस लागार असल्याचे वक्तव्य सहकार मंत्री अतुल सावे यांनी गुरुवारी नगर जिल्ह्यात केल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
अतुल सावे यांनी नगरमध्ये पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, राज्यात नव्या सहकारी संस्थांच्या नोंदणीचे काम काही वर्षांपासून बंदच आहे. आता पुन्हा नोंदणी सुरू केली जाणार आहे. त्यासाठी स्थानिक भाजपच्या जिल्हाध्यक्षांची शिफारस अवश्यक आहे. त्यांच्या या विधानावर आक्षेपही दर्शविले जाऊ लागले आहेत.
बँकेचे सभासदत्वही मिळवून देतो
पक्षाच्या कार्यकर्त्याला सहकारी बँकेचे सभासदत्व हवे असल्यास माझ्याकडे या, मी ते मिळवून देतो, असेही ते म्हणाले. सहकार मंत्री अतुल सावे आज शहराच्या दौऱ्यावर होते. सकाळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सहकार विभाग व इतर मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या योजनांचा आढावा घेतला.
बाजार समित्यांच्या निवडणुका लवकरच
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ३० एप्रिलपर्यंत घेण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू असली तरी त्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली जाईल. बाजार समित्यांच्या निवडणुकीत शेतकऱ्याला उमेदवारी करता येईल, त्यासाठी लवकरच आदेश काढला जाईल, अशी माहिती सहकार मंत्री सावे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
त्या संस्थांच्या निवडणुकाही ३ महिन्यांत
ज्या सहकारी पतसंस्था, नागरी बँकांच्या सहकार कलम ८३ व ८८ अन्वये चौकशी सुरू आहे, त्यांची त्वरित चौकशी पूर्ण करून कारवाई करावी. अशी प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत, अशी सक्त सूचना सहकार मंत्री सावे यांनी अधिकाऱ्यांना दिली. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या संस्था अवसायनात आहेत त्यांच्या निवडणूक प्रक्रिया येत्या तीन महिन्यात सुरू करावी, अशीही सूचना त्यांनी केली.
Minister Save on Cooperative Institutes Registration Controversy