जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी तब्बल ४० दिवस राज्याचा कारभार चालवल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून त्यामध्ये १८ मंत्रांचा समावेश झाला आहे, परंतु अद्यापही खातेवाटप बाकी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार तर झाला परंतु खाते वाटप कधी होणार? या संदर्भात चर्चा सुरू आहे. यासंदर्भात मंत्री गिरीस महाजन यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
त्याचप्रमाणे माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. विशेषतः बीड जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते आणि बंजारा समाज यांच्याकडून पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करावे, असा आग्रह धरण्यात येत होता परंतु पंकजा मुंडे यांचा अद्यापही मंत्रिमंडळ समावेश झालेला नाही, त्यामुळे खुद्द पंकजा मुंडे यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
परंतु दुसरीकडे विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळाच्या खाते वाटप संदर्भात माहिती दिली असून पंकजा मुंडे यां यांच्या संदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता १७ ऑगस्टपासून विधिमंडळाचे अधिवेशन राहणार आहे. त्यामुळे त्यापूर्वीच मंत्र्यांचे खाते वाटप होईल, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे व्यक्त केला. यासोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत व सिंचनासह रस्ते, वीज, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गिरीश महाजन यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी जळगाव येथे त्यांचे रेल्वेने आगमन झाले. यावेळी महाजन यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालादेखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
जळगाव रेल्वे स्टेशनवर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत केले. pic.twitter.com/6edHZyD75J
— Girish Mahajan (Modi Ka Parivar) (@girishdmahajan) August 12, 2022
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या विषयांवर टीका केली. अडीच वर्षात खुंटलेला विकास डबल इंजिनच्या सरकारमुळे दुप्पट वेगाने होणार अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचा विकास खुंटला आहे. आता मंत्रीपद मिळाल्याने मोठी जबाबदारी वाढली आहे. राज्यात सिंचन, रस्ते, वीज, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विविध समस्या आहे. सोबतच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यास प्राधान्य राहणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. युती सरकारमध्ये आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दमदार नेतृत्व असून सोबतच केंद्रातील भाजप सरकारमुळे डबल इंजिन राहणार असल्याने विकासाचा वेग दुपटीने होईल, असा विश्वास व्यक्त करीत राज्यातील रखडलेली कामे वेगाने करण्यावर भर राहणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील टीका करीत त्यांनी कार्यकर्ते तर दूरच मंत्री, आमदारांच्यादेखील त्यांनी भेटी घेतल्या नाही व केवळ ऑनलाइन कामकाज चालविले. त्यामुळे राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहे.पालकमंत्रीपद निश्चित असल्याचे संकेत स्वातंत्र्य दिन अवघ्या तीन दिवसांवर आला असून या दिवशी ध्वजारोहण नेमके कोणाच्याहस्ते होईल याविषयी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव येथे गुलाबराव पाटील यांच्याहस्ते तर माझ्या हस्ते नाशिक येथे ध्वजारोहण होईल, असे सांगितले. ध्वजारोहण तसे पालकमंत्र्यांचे हस्ते होत असते त्यामुळे गिरीश महाजन यांनी दिलेल्या या माहितीमुळे पालकमंत्री पद जवळपास निश्चित झाले असल्याचे मानले जात आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात काही आमदारांची नाराजी असल्याविषयी महाजन म्हणाले की, अजून २३ मंत्री शपथ घेणे बाकी आहे. त्यात पंकजा मुंडे यांची नाराजी असण्याचा प्रश्नच येत नाही. कदाचित त्यांना मोठेपद मिळू शकते, असे महाजन म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराला दिरंगाई झाली हे मान्य आहे असे सांगत त्यांनी थोडीफार नाराजी असतेच मात्र ती दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असे स्पष्ट केले.
तसेच संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद देण्याविषयी महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने राठोड यांना क्लीन चिट दिली असून त्यांनीच क्लीनपीठ द्यायची व आता मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्यावर टीका करायची, हे योग्य नसल्याचे म्हणाले. तसेच भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीदेखील राठोड यांच्या बद्दल केलेल्या टीके विषयी ते त्यांचे वैयक्तिक मत आहे, असे महाजन म्हणाले. म्हणजे एक प्रकारे महाजन यांनी संजय राठोड यांचे पाठराखणच केल्याचे समजते.
Minister Portfolio Allocation Girish Mahajan Says
Maharashtra Government