नाशिक – आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात ‘हर घर तिरंगा’ मोहिमे राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी संघर्ष, त्याग व आपल्या प्राणांची आहूती दिली आहे. त्यांच्या इतिहासाला उजाळा मिळणार आहे. विकासचे शिखर गाठतांना येणाऱ्या पिढी समोर आपल्या देशाच्या इतिहासाचे स्मरण करणे आवश्यक आहे. तसेच पंतप्रधानांच्या ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेला प्रतिसाद देत प्रत्येकाने घरोघरी तिरंगा मोहिमेत योगदान द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी केले.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकास भेट देऊन राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण केले , त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, जिल्हाधिकारी गंगाथरण.डी., सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रुकमैया मीना, हर घर तिरंगा मोहिमेचे नोडल अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, वि.दा.सावरकर यांची नात असिलता सावरकर राजे, तहसीलदार अनिल दौंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.दानवे-पाटील पुढे म्हणाले की, सावरकरांनी व अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी त्यावेळेस संघर्ष केला नसता तर आजही आपण ब्रिटीशांच्या गुलामगिरीत राहिलो असतो. त्यामुळे स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासाची माहिती प्रत्यक्ष स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांकडून होण्यासाठी या मोहिमेत स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेण्याचे केंद्र सरकारचे धोरण होते. त्यानुसार या मोहिमेत स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांना मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेण्यात आले आहे.
७५ स्वातंत्र्यसैनिकांचा अंदमान भेटीचा खर्च रेल्वे विभाग उचलणार
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अंदमान येथे ब्रिटीशांचा अनेक अन्याय अत्याचार सहन केले. त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराची, संघर्षाची माहिती स्वातंत्र्यसैनिकांना होण्यासाठी जे सावरकरांच्या कार्याने प्रेरीत होवून स्वातत्र्यांसाठी लढा दिला अशा ७५ स्वातंत्र्यसैनिकांना अंदमान येथे नेण्यात यावे. याचा सर्व खर्च रेल्वे विभागामार्फत करण्यात येईल, असे आश्वासन श्री.दानवे-पाटील यांनी दिले.
केंद्र सरकारच्या योजना गरिबांच्या कल्याणसाठी
आपल्या देशाची लोकसंख्या सव्वाशे कोटी असून ८० कोटी जनता गरीब आहे. त्यामुळे केंद्र सरकार गरीब जनतेसाठी समर्पित आहे. कोरोनाकाळात केंद्र शासनाने मोफत अन्न-धान्य योजना राबविली. मोफत लस उपलब्ध करुन दिली. तसेच तोट्यात असूनही रेल्वे नागरिकांना सेवा देत आहे. दळणवळणाची साधनं भक्कम झाली तरच गाव, जिल्हे, राज्याचा विकास होत असतो. त्यामुळे येत्या काळात दळवळणाची साधने भक्कम करण्यासाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग तयार झाला असून याठिकाणी बुलेट ट्रेन करण्याचा प्रस्ताव असून राज्य शासनाचा देखील सहभाग घेतला जात आहे. कार्यक्रमापूर्वी श्री.दानवे-पाटील यांनी वि.दा.सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सावरकरांचे जन्मस्थळ असलेल्या स्मारकाची पाहणी केली.
पुढील पिढीला सावरकरांच्या संघर्षाची व योगदानाची माहिती होण्यासाठी सावरकरांनी भगूर येथे अष्टभुजा देवीपुढे घेतलेल्या शपथेचा व त्यांनी देशासाठी जो जो लढा दिला त्या आठवणींचे देखावे तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी यावेळी सावरकर यांची नात असिलता सावरकर-राजे यांनी यावेळी केंद्रीय राज्यमंत्री दानवे-पाटील यांच्याकडे केली.
भारतमातेचा जयघोष करत झाला स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा सन्मान…
श्री. दानवे- पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. मनोहर त्र्यंबक कुलकर्णी, गजानन बीरार यांचे वारस लिलाबाई गजानन बिरार, रघुनाथ खालकर यांचे वारस विठाबाई रघुनाथ खालकर, एकनाथ मोजाड यांचे वारस सत्यभामा एकनाथ मोजाड, केशव मोरे यांचे वारस कृष्णाबाई केशव मोरे, सोमनाथ मनियार यांचे वारस कौशल्या सोमनाथ मनियार, लक्ष्मण गोसावी यांचे वारस सुमन रमेश गिरी-गोसावी, मदनलाल मनियार यांचे वारस सुमन मदनलाल मनियार, भाई कलंत्री यांचे वारस संगीता प्रवीण कलंत्री, निर्मला वि जाधव, वसंत बाळकृष्ण हुदलीकर यांचे वारस सुमंत वसंत हुदलीकर, शंकर गजमल जगताप यांचे वारस नंदू शंकर जगताप, रघुनाथ कोंडाजी घोडे यांचे वारस दिनकर अशोक घोडे, श्रीधर रहाणे यांचे वारस मनोरमा रहाणे यांच्यासह उपस्थित स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी भारतमातेचा एकच जयघोष करुन वातावरण उत्साही केले.