इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी मनोरंजन सृष्टीतील एक गुणी अभिनेता म्हणून सुव्रत जोशी ओळखला जातो. नाटक, चित्रपट, मालिका, वेबसिरीज अशा वेगवेगळ्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. नुकताच सुव्रतचा ‘गोष्ट एका पैठणीची’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या सुव्रत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याची सोशल मीडियावरील एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
सुव्रत सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी तो चाहत्यांशी नेहमीच शेअर करत असतो. अशीच एक मोठी बातमी त्याने आपल्या पोस्टद्वारे चाहत्यांना दिली आहे. “आता पूर्णविराम देण्याची वेळ झाली,” असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे चाहत्यांना हे नेमके कशाबद्दल आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर त्याची ही पोस्ट आहे त्याचं नाटक ‘अमर फोटो स्टुडिओ’ विषयी.
टेलिव्हिजनमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सुव्रतने रंगभूमीपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतील त्याची सुजय साठे ही भूमिका अजूनही प्रेक्षकांना लक्षात आहे. त्यानंतर त्याने शिकारी, गोष्ट एका पैठणीची अशा नावाजलेल्या सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर पडली आहे. सुव्रतची महत्वपूर्ण भूमिका असलेलं ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक गेली अनेक वर्ष रंगभूमीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. लवकरच हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुव्रतने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. या नाटकात त्याच्यासोबत ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील सहकलाकार अमेय वाघ, पूजा ठोंबरे आणि सखी गोखले यांनी देखील काम केले होते. २०१६ मध्ये सुरू झालेल्या या नाटकाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. आता या नाटकाविषयी सुव्रतने पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे.
सुव्रतने आपल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ”२०१६ मध्ये नव्या दमाच्या काही कलाकारांसोबत या प्रवासाला सुरुवात केली. ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे त्या प्रवासाचं नांव. मोठमोठ्या कलाकारांच्या पंक्तीत आपल्या ह्या नवीन मेन्यूला कशी दाद मिळेल याची धाकधूक प्रत्येकाच्या मनात होती. मनस्विनी लता रविंद्र लिखित, निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित हे नाटक १३ ॲागस्ट २०१६ रोजी साली रंगमंचावर आलं.” आपल्या याच पोस्टमध्ये तो पुढे म्हणतो, ”अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, सिद्धेश पुरकर, पूजा ठोंबरे ह्या पाच दमदार कलाकारांनी उत्कृष्ट पद्धतीने ते नाटक सादर करून सर्व वयोगटातील नाटकवेड्या प्रेक्षकांची मने जिंकली. सखी आणि सिद्धेश वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने थोडे विसावले, पण पर्ण पेठे आणि साईनाथ गणूवादने नाटकाच्या यशाची घोडदौड सुरूच ठेवली. पण…आता वेळ आलीये पूर्णविराम देण्याची. ज्या प्रेक्षकांनी उदंड प्रेम देऊन आम्हाला आनंद दिला, त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी, जानेवारी २०२३ मधे ह्या नाटकाचे मोजके प्रयोग आम्ही करणार आहोत.” आता अमर फोटो स्टुडिओ हे नाटक लवकरच रंगभूमीवरून निरोप घेणार असल्याची घोषणा सुव्रतने केली आहे. सुव्रतच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करत शेवटचे काही प्रयोग पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली आहे. अवघ्या काही वेळातच सुव्रतच्या या पोस्टवर प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. त्यावरून या नाटकाची लोकप्रियता नक्कीच लक्षात येते.
Marathi Actor Suvrat Joshi Post on Social Media
Entertainment TV Drama