मालेगाव – त्रिपुरातील घटनेचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेप्रकरणी आतापर्यंत ५२ संशयिताना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रझा अॅकॅडमीच्या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. हे पुरावे न्यायालयात सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
येथील रझा अॅकॅडमीच्या कार्यालयावर सोमवारी टाकलेल्या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे, बंदसंदर्भातील पत्रके, संगणक आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले होते. या घटनेचा मुख्य सूत्रधारासह चिथावणी देणार्या फरारी पदाधिकार्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. निरपराध नागरिकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. तर, मालेगाव दंगल प्रकरणी आतापर्यंत ४५ जणांना अटक करण्यात आल्याचे पोलिस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी सांगितले आहे.
त्रिपुरातील घटनेनंतर मालेगावसह अमरावती, नांदेड येथे पडसाद उमटले होते. या घटनांमध्ये पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. यात अनेक पोलिस जखमी झाले होते. पोलिसांनीही प्रत्युत्तरात लाठीमार केला होता. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे.