मुंबई – सुमारे महिन्यापासून गाजत असलेल्या कथित शंभर कोटीच्या हप्तेखोरी आणि भ्रष्टाचार प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना न्यायालयाने खंडणी प्रकरणात फरार घोषित केले आहे. सतत समन्स बजावूनही हजर न झाल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतला. परमबीर यांच्या आरोपांवरून महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख विरोधात सीबीआय चौकशी सुरू झाली. मात्र, परमबीर आता फरार घोषित झाल्याने आता पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सिंग यांच्यावर हप्ते वसुलीचा गुन्हा दाखल झाला होता. सुमारे सहा महिन्यांपूर्वी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात खळबळ उडवून देणाऱ्या मुंबईतील या कथित गुंतागुंतीच्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे अनेक जणांना अटक झाली होती. परंतु तेव्हापासून परमविर सिंग हे चौकशीला सामोरे जाण्याऐवजी लपून बसले होते. अनेक वेळा कोर्टाने समन्स बजावून देखील हजर न राहल्याने अखेर त्यांना फरार घोषित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणात वाजेच्या अटकेनंतर सिंग यांना मार्च २०२१ मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवण्यात आले होते.
आता सिंग यांना ३० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून, या कालावधीत ते न्यायालयात हजर न झाल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. जगातील अत्यंत हुशार, धाडसी आणि शौर्यवान समजल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांची तुलना ही इंग्लंडमधील स्मार्ट पोलिसांशी ( बॉबी ) केली जाते. परंतु तरीही मुंबई पोलिस हे माजी आयुक्त शोधू शकले नाहीत, हे वास्तव आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करणार्या मुंबई पोलिसांनी भारतीय पोलिस सेवेचे आयपीएस अधिकारी सिंग यांना फरार घोषित करण्याची विनंती केली होती. कारण त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट असूनही त्याचा शोध घेता आला नाही.
विशेष म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलमानुसार जर आरोपीने विरुद्ध जारी केलेले वॉरंट न्यायालयाने जाहीर केले, तर त्याला हजर राहणे आवश्यक असते. परंतु तरीही सदर आरोपी कोर्टात हजर झाला नाही तर एका महिन्याच्या आत न्यायालय आरोपीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देऊ शकते. त्यामुळे माजी आयुक्त परमबीर यांना उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात फटकारले असून कोणीही कायद्याच्या वर नाही, असे म्हटले आहे. परमबीर हे फरार घोषित झाल्याने आता त्यांच्या संपत्तीवर टाच येणार आहे. परमबीर यांनी किती माया गोळा केली आहे, त्यांची संपत्ती किती आहे, हे सारे आता हळूहळू स्पष्ट होणार आहे.
जानेवारी ते मार्च २o२१ दरम्यान अनेक संशयास्पद, खंडणी प्रकरणाच्या आणि गुंतागुंतीच्या घटना घडल्याचा दावा केला जात होता. या प्रकरणा अंतर्गत सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात माजी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाजे हे देखील गोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी आहेत. तर सध्या परमबीर सिंग यांच्याबरोबरच सहआरोपी विनय सिंग आणि रियाझ भाटी यांनाही अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी ‘फरार’ घोषित केले आहे.