भोपाळ – कोणत्याही राजकीय नेत्याच्या सभेसाठी खाण्या-पिण्याचे किंवा पैशांचे आमिष दाखवून गर्दी जमविणे ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही. गरीब, गरजू नागरिकांना अशा बहाण्यात अडकवून राजकीय नेते त्यांचा गैरवापर करत असतात. परंतु काही वेळा अशा नागरिकांचा केवळ वापरच करून घेतला जातो. त्यांना काहीच दिले जात नाही. अशीच घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान घडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पूर्वांचल एक्सप्रेस वेचे लोकार्पण झाले. या वेळी त्यांनी एका सभेला संबोधित करताना समाजवादी पार्टी सरकारच्या कार्यकालावर जोरदार टीका केली. पंतप्रधानांच्या या सभेला नागरिक खूप लांबच्या गावांतून आले होते. परंतु सभेदरम्यान या नागरिकांना अन्न सोडाच, पाणीही विचारण्यात आले नाही. या गोष्टीचा खुलासा सभेत सहभागी झालेल्या नागरिकांनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ माजी सनदी अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
पीएम मोदी यांच्या सभेत सहभागी होण्यासाठी एका महिला पंचायत सहाय्यकांनी सोबत ५८ नागरिकांना आणले होते. परंतु सभा संपल्यानंतर त्यांना तेथून जाताना वाहनच मिळाले नाही. आम्हाला काहीच मिळाले नाही, पाणी सुद्धा विचारले नाही. आमची बसही गायब झाली होती, कोणाशी बोलणे होत नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. संबंधित पंचायत सहाय्यक म्हणाल्या, सभेच्या ठिकाणी नाश्त्याची सोय आहे असे आम्हाला सांगण्यात आले होते, परंतु आम्हाला तेही मिळाले नाही. सकाळी आठ वाजेपासून आम्ही येथे येऊन बसलो आहोत. एका महिलेने झालेल्या त्रासाबद्दल सांगितले, पाणी नाही, अन्न नाही, काहीच विचारले नाही.
हा व्हिडिओ शेअर माजी आयएएस सूर्यप्रताप सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुम्हाला हे ठाऊक आहे का? बसमध्ये भरून आणलेल्या या नागरिकांना नाश्ता, पाणी देण्यात आले नाही. नंतर त्यांना तसेच सोडून देण्यात आले. या महिलांचे दुःख ऐका. सभेत जबरदस्तीने गर्दी जमविण्यासाठी सरकार या थराला जाते का?
सूर्यप्रताप सिंह यांच्या या व्हिडिओवर युजर्सनी कॉमेंट केल्या आहेत. त्याच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सत्यप्रकाश भारती नावाच्या युजरने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संबंधित व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ते पंतप्रधान मोदी यांच्या कारच्या मागे चालत येत असल्याचे दिसत आहे. ते लिहितात, योगीजी काय करू शकतात. परत येताना त्यांनाही वाहन मिळाले नाही. सचिन नावाच्या एका युजरने लिहिले, की चला, कमीत कमी ५८ मते तर गेली. बघा महिलेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/suryapsingh_IAS/status/1460853354913882113