मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येत्या पंधरा दिवसांत महाराष्ट्राचे नेतृत्व बदलणार असल्याच्या राजकीय गौप्यस्फोटाने राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या हालचालींमुळे आणि सूचक विधानांमुळे निर्माण झालेली शंका आता खरी ठरते की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.
२०१९ मध्ये अजितदादांनी भाजपसोबत पहाटेची शपथ घेऊन सरकार स्थापन केले होते. तो ऐतिहासिक प्रयत्न पूर्णपणे फसला होता. कारण शरद पवारांना अजितदादांचे मन वळविण्यात यश आले होते. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. दरम्यान, शिवसेनेत उभी फुट पाडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि महाराष्ट्राला पुन्हा एक धक्का दिला. आता मात्र राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे.
ही प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली असली तरीही त्याला अद्याप शरद पवार यांची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे सारेकाही थांबलेले आहे. परंतु, राष्ट्रवादीचा गट भाजपसोबत गेल्यानंतर एकनाथ शिंदे पायउतार होतील आणि अजितदादा पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असे वृत्त ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. विशेष म्हणजे अगदी दोनच दिवसांपूर्वी आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंधरा दिवसांत सरकारमध्ये मोठे बदल होतील, अशी पोस्ट सोशल मिडियावर केली होती.
तर गेल्या आठवड्यात अजित पवार दोन दिवस गायब असल्यामुळे त्यांच्या हालचालींवरूनही शंका निर्माण झाली होती. त्यावेळी ते दिल्लीत अमित शहांना भेटायला गेले होते. तिथे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत खातेवाटपावरही चर्चा झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. पटेल हेच संपूर्ण घडामोडींचे सूत्रधार असल्याचेही बोलले जात आहे.
भाजपचा डाव
चिन्ह आणि नाव दोन्ही एकनाथ शिंदेंना मिळाले असले तरीही कोर्टाचा निकाल त्यांच्या विरोधात जाण्याची शक्यता बळावली आहे. अश्यात अपात्र ठरल्यास पदावरून पायउतार व्हावे लागेल. त्यामुळे भाजपने अजित पवार यांना हाताशी घेऊन सारा डाव रचल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांच्यासोबत ३५ आमदार आहेत. त्यांना घेऊन ते भाजपमध्ये सामील होणार आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार. आणि भाजपलाही मराठा चेहरा मुख्यमंत्री म्हणून मिळणार. परंतु, स्वतःच्या जबाबदारीवर सारेकाही ठरवा, असे शरद पवारांनी अजितदादांना म्हटले आहे. शरद पवारांना उजव्यांच्या गटात सामील झाल्याचा डाग लावून घ्यायचा नाही, असे या वृत्तामध्ये म्हटले आहे.
राऊत आणि आंबेडकरांचा दावा
पवार कुटुंबाला भाजपकडून टार्गेट करण्यात येत असल्याचा दावा संजय राऊत यांनी सामनामधून केला आहे. यात त्यांनी व्यक्तिगत निर्णय घेण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण आम्ही पक्ष म्हणून भाजपसोबत जाणार नाही, असे म्हटले आहे. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा पंधरा दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे स्फोट होतील, असा दावा केला आहे. यात भाई जातील आणि दादा येतील, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
Maharashtra Politics Chief Minister NCP Ajit Pawar