मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बच्चू कडूंची विधानं आणि त्यांचे इशारे राजकीय वर्तुळात कायम चर्चेत असतात. कधी ते सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा देतात तर कधी मंत्रीमंडळ विस्तारावरून आपल्याच सरकारला धारेवर धरतात. पण यावेळी त्यांनी असे काही विधान केले आहे, की ज्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांनी सरकार कोसळणार नाही, असा दावा करतानाच शिंदे गटातील आमदार बाहेर पडणार असल्याची भविष्यवाणी केली आहे.
बच्चू कडू सध्या मंत्रीमंडळ विस्तार लांबल्यामुळे कमालीचे नाराज आहेत. गेल्या महिन्यात तर त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला होता. विस्तार होत नसेल तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे, असे बोलून त्यांनी सरकार हलवून सोडले होते. पण लगेच दोन दिवसांनी बच्चू कडू यांचा राग शांत करण्याचं काम शिंदे-फडणवीस यांनी केलं. त्यानंतर आता बच्चू कडू यांनी शिंदे गटातील २० ते २५ आमदार पक्षातून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले आहेत. एवढेच नाही तर काही बाहेरच्या पक्षातील आमदारही सरकारमध्ये सामील होतील.
न्यायालयातील प्रलंबित खटल्यामुळे या आमदारांचा पक्षप्रवेश आणि मंत्रीमंडळ विस्तार खोळंबलेला आहे, असेही बच्चू म्हणाले. बच्चू यांच्या विधानामुळे संभ्रम निर्माण होत आहे. कारण तिकडे महाविकास आघाडी सातत्याने सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असा दावा करत आहे, तर शिंदे-फडणवीस सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असा दावा सरकारच्या वतीने केला जात आहे. अशात बच्चू यांनी आमदार बाहेर पडणार असल्याचे वक्तव्य करून सर्वांना संभ्रमात टाकले आहे.
कुठे जाणार आमदार?
बच्चू कडू यांनी शिंदे गटातील २० ते २५ आमदार येत्या १५ दिवसांमध्ये बाहेर पडणार असल्याचे सांगतानाच हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असेही स्पष्ट केले. या आमदारांसह आणखी बाहेरच्या पक्षातील आमदार आपल्याकडे येतील, असाही दावा त्यांनी केला आहे.
ठाकरे गटाकडे आमदारच नाहीत
बच्चू कडू यांनी ठाकरे गटाकडे आमदारच नाहीत, त्यामुळे इतर पक्षातील आमदार आपल्याकडे येणार आहेत, असे म्हटले. ‘सरकार कोसळण्याचे कारणच नाही. सरकार बहुमतात नव्हे तर अतिबहूमतात आहे. २०-२५ आमदार इकडचे तिकडे झाले तरीही कार्यकाळ पूर्ण होईल. फक्त न्यायालयातील प्रलंबित खटल्यामुळे पक्षप्रवेश थांबला आहे. ठाकरे गटाकडे तर आमदारच नाहीत, त्यामुळे इतर पक्षातील आमदारही येत्या अधिवेशनापूर्वीच आमच्याकडे येणार आहेत,’ असे बच्चू कडू म्हणाले.
आदित्य ठाकरेंना आव्हान
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळीतून विधानसभा लढावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले होते. त्यावर बोलताना बच्चू कडू यांनी अशा आव्हानांना अर्थ नसतो, हा केवळ बालीशपणा आहे, असे म्हटले. निवडणूक जाहीर होईल तेव्हा बोला. आणि हौस असेल तर त्यांनीच एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातून लढून दाखवावे, असे आव्हान बच्चू कडू यांनी दिले.
Maharashtra Political Crisis Soon 15 to 20 MLA Party Change