नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर येथील लॉजमध्ये प्रेमीयुगुलाने विषारी औषध सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. तानाजी चौधरी (४०, रा. गांधी नगर ) आणि रूपाली जाधव (३५, रा.सातपूर) हे या आत्महत्या करणा-या प्रेमीयुगालाचे नाव आहे. या दोघांनी विषारी औषध सेवन केल्याचे हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना लक्षात येताच त्यांनी या दोघांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण, तब्येत जास्त बिघडल्याने त्यांना तातडीने नाशिक येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपाचरा दरम्यान सकाळी साडेसहा वाजता तानाजी चौधरी तर रूपाली जाधव हिचा दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला. या दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.
बुधवारी १४ डिसेंबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे आपण पती-पत्नी असल्याचे सांगत त्यांनी मंदिराच्या समोरच असलेल्या प्रितम लॉज येथे रुम घेतली होती. यावेळी त्यांनी धार्मिक विधीला आल्याचेही आल्याचे सांगत लॅाज चालकांना आधार कार्ड व पॅन कार्डही दाखवले. त्यांची रजिस्टरमध्ये नोंदही करण्यात आली. हे दोघे रुममध्ये गेले मात्र रात्री दोन वाजेच्या दरम्यान रुपालीला उलटया होत असल्याने ती रुम बाहेर आली. यावेळी वेटरला संशय आल्याने त्यांनी रुममध्ये बघितल्यानंतर किटनाशकाची तसेच पिण्याच्या पाण्याच्या दोन छोटया बाटल्या आणि मद्याची बाटली दिसून आली. त्याने आपल्या सहका-यांच्या मदतीने दोघांना त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवले. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी प्रथमोपचार केले. मात्र, त्यांची अवस्था जास्त बिघडल्याने त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आले. येथे दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.