मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भीषण खारघर दुर्घटनेप्रकरणी आम आदमी पार्टीने कोर्टात धाव घेतली आहे. या दुर्घटनेस जबाबदार महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या संयोजकांवर गुन्हे दाखल करावा अशी मागणी यात करण्यात ाली आहे. तसा तक्रार अर्ज आप राज्य सचिव धनंजय शिंदे यांच्याकडून पनवेल कोर्टात दाखल करण्यात आला आहे.
आपने तक्रारीत म्हटले आहे की, महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या दरम्यान अक्षम्य हलगर्जीपणामुळे १४ (सरकारी आकडेवारीनुसार) श्रीसदस्य मृत्युमुखी पडले तसेच शेकडो जण गंभीर जखमी झाले आहेत. आग ओकणाऱ्या रणरणत्या उन्हात हजारो श्रीसदस्य उघड्यावर अनेक तास अन्न,पाण्याविना बसून होते. त्यामुळे ही भीषण दुर्घटना आपण सर्वानी बघितली. वास्तविक पाहता महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा नेहमी छोटेखानी कार्यक्रम असतो राजभवनात किंवा एखाद्या बंदिस्त सभागृहात पार पाडल्या जातो, परंतु प्रत्येक गोष्टीत प्रचार आणि इव्हेंट करण्याचा चंग या सरकारने केलेला आहे हे आपण बघत आहोत. परंतु संधीसाधू शिंदे फडणवीस सरकारच्या प्रचाराची किंमत १४ श्रीसदस्यांनी आपले प्राण गमावून केली आहे असे खेदाने नमूद करावे लागत आहे.
आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करत आहेत तसेच दोषींवर गुन्हे दाखल व्हावे यासाठी पनवेल पोलीस स्थानकात जाऊन तक्रार देखील केली, त्याचप्रमाणे पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून, भेटीगाठी केल्या. अनेक स्मरणपत्र पाठवली. परंतु सरकारच्या दडपशाहीमुळे कुठलीही कारवाई होत नाही. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक, राज्यपाल यांना कारवाईच्या मागणीचे पत्र देण्यात आले होते परंतु काहीही होत नसल्यामुळे न्यायालयाचा मार्ग स्वीकारला आहे.
धनंजय शिंदे यांनी पनवेल सत्र न्यायालयात सोहळ्याच्या संयोजकांवर गुन्हे दाखल व्हावे या मागणीचा तक्रार अर्ज बुधवार दि. २६ एप्रिल २०२३ रोजी दाखल केला आहे. *भारतीय दांडसंहिता कलम ३०४, ३०८, ३३६, ३३८, ११४* नुसार सदोष मनुष्यधाच्या गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी केली आहे. तसेच सदर अर्जाची दखल घेत कलम १५६(३) अंतर्गत पोलिसांनी सखोल चौकशी करून न्यायालयात अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. शेवटी न्यायव्यवस्थाच मुजोर नेत्यांना आणि त्यांच्या दावणीला बांधलेल्या प्रशासनाला ठिकाणावर आणू शकते असा आम्हाला विश्वास आहे.
या न्यायालयीन लढाईत ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. असीम सरोदे मदत आणि मार्गदर्शन करत आहेत. तसेच पक्षाचे राज्य अध्यक्ष मा. रंगा राचुरे यांच्या मार्गदर्शना खाली, कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. अल्तमज फैजी, रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज घरत, पनवेल शहर अध्यक्ष जयसिंग शेरे व पक्षाची संपूर्ण कोकण विभागीय मंडळी पाठपुरावा करत आहेत. मृत १४ श्री सदस्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आम आदमी पार्टीचा लढा सुरू राहील.
Kharghar Incidence Aam Admi Party Court Complaint