अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील बाळापूर येथील शेतकरी रामकृष्ण पोपट शिरसाठ यानीं गेल्या वर्षी लासलगाव येथून फर्टिलायझर्स च्या दुकानातून १० आक्टोंबर २०२१ रोजी कंपनीचे ४ किलो बियाणे उन्हाळ म्हणून घेतले होते. बियाणे विकत घेऊन लागवडीसाठी बियाणे शेतात टाकले, मात्र त्यांना ते रोप लागवडी दरम्यान उन्हाळ कांद्याचे नसून लाल कांद्याचे असल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी दुकानदार व कंपनीकडे तक्रार केली, तेव्हा कंपनीकडून ते बियाणे उन्हाळ असल्याचे सांगितले व त्यांनी त्या रोपाची लागवड केली. मात्र कांदा काढणीनंतर या शेतकऱ्याने पुन्हा हे बियाणे लाल असल्याचा दावा केला. मात्र संबंधितांनी सदर बियाणे गावरान म्हणजे उन्हाळ असल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांनी तो उन्हाळ कांदा दर कमी असल्याने चाळीत साठवला. मात्र तो कांदा खराब झाल्याने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. या शेतकऱ्याने तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती तथा उपविभागीय कृषी अधिकारी निफाड यांच्याकडे सदर कंपनी विरोधात फसवणुकी तक्रार नोंदवली आहे.मात्र या प्रकरणी अद्यापही काही कार्यवाही झाली नसल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.