जन्माष्टमी विशेष लेखमाला
भगवान श्रीकृष्णाने येथे केला देहत्याग
भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातील सर्वच ठिकाणं भाविकांसाठी अतिशय महत्वाची आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त यंदा प्रथमच ‘इंडिया दर्पण’ मधून भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रातील प्रमुख स्थानांची माहिती आपण पहिली. अशा प्रकारची श्रीकृष्णाची लेखमाला जन्माष्टमी निमित्त मराठीत प्रथमच प्रकाशित होत असावी. या लेखमालेला जो उदंड प्रतिसाद मिळाला तो खरोखरच भारावून टाकणार आहे. आज आपण अशा ठिकाणाची माहिती घेणार आहोत ज्याबद्दल फारसे बोलले जात नाही किंवा ज्याविषयी अनेकांना माहित नाही. ते म्हणजे, भगवान श्रीकृष्णाने जिथे देहत्याग केला त्या भूमी विषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत….

मो. ९४२२७६५२२७
भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला ते मथुरेचं ‘जन्मभूमी मंदिर’, जिथे श्रीकृष्णाचे बालपण गेले ते वृंदावनचं ‘श्री बांके बिहारी मंदिर’,कंस वधानंतर श्रीकृष्ण,बलराम आणि सुदामा यांनी जेथे शिक्षणाचे धड़े घेतले तो उजैनचा ‘संदीपनी ॠषींचा आश्रम’, भगवान श्रीकृष्णाच्या कर्तुत्वाला खर्या अर्थाने बहार आली ती ‘द्वारका नगरी’, श्रीकृष्णाने पांडवांना सदैव साथ दिली.
महाभारताचे युद्ध घडू नये यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले,यासाठी तो अनेक वेळा ‘हस्तिनापुर’ या कौरवाच्या राजधानीत गेला. हे प्रयत्न विफल झाल्यावर पांडवासोबत राहून त्याने यमुनेच्या काठावरील खांडवप्रस्था वर ‘इंद्रप्रस्थ नगरी’ची स्थापना करण्यासाठी मार्गदर्शन केले आणि जेंव्हा सर्व मार्ग खुंटले तेव्हा महायुध्दात अर्जुनाचे सारथ्य करुन पांडवाना मार्गदर्शन केले. त्यासाठी साक्षात युद्ध भूमीवर ‘कुरूक्षेत्रा’वर युद्धापूर्वी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. भगवान श्रीकृष्णाशी संबधित या सर्व स्थानांची माहिती आपण घेतली.
भगवान श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी आपले जीवन संपविले त्या ‘प्रभास पत्तन’ येथील ‘भालका तीर्था’ची माहिती आज आपण घेणार आहोत.
भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला. त्याचं लहानपण गोकुळ,वृंदावन, नन्दगाव, बरसना या ठिकाणी गेलं. आपला मामा कंसाच्या वधा नंतर त्याने आपल्या माता पित्याची कारागृहातून मुक्तता केली आणि आपले नाना उग्रसेन यांना मथुरे च्या राज्यावर बसविले. कंसाला ठार मारल्या मुळे कंसाचा सासरा जरासंघ कृष्णाचा कट्टर शत्रु बनला. त्याने श्रीकृष्णाला मारण्यासाठी मथुरेवर १८ वेळा आक्रमण केली. १७ वेळा असफल झाल्यावर त्याने कालयवन नावाच्या विदेशी शासकाच्या मदतीने मथुरेवर आक्रमण केले परंतु श्रीकृष्णा ने कालयवनाचा देखील नाश केला. मथुरेवर वारंवार होणार्या या आक्रमणाना कंटाळून, शेवटी सर्व यदुवंशी यांना घेउन श्रीकृष्णाने मथुरा सोडण्याचा निर्णय घेतला.
विनीतेचा पुत्र गरुड याचा सल्ला आणि ककुद्मी याचे आमंत्रण स्वीकारुन श्रीकृष्ण कुशस्थली येथे आले. विद्यमान द्वारका नगरी कुशस्थली च्या रुपांत पहिल्या पासून अस्तित्वात होती. या उजाड़ नगराला श्रीकृष्णाने पुन्हा नव्याने वसविले. ही श्रीकृष्णाच्या पूर्वजांची भूमी होती कृष्णाने ती पुन्हा रहण्यास योग्य बनविली.कृष्ण आपल्या १८ बंधुंसह गुजरातच्या समुद्र तटावरील कुशस्थली येथे आले. येथे त्यांनी भव्य द्वारका नगरीची निर्मिती केली. संपूर्ण नगरला चारही दिशांनी मजबूत तटबंदी बनवून भक्कम संरक्षण मिळवून दिले.
भगवान श्रीकृष्ण आपल्या संपूर्ण परिवारासोबत ८ बायका आणि त्यांच्या मुलांसह येथे ३६ वर्षे सुखाने नांदले. येथे राहूनच ते हस्तिनापुरच्या राजकारणाशी संलग्न राहिले.येथूनच त्यांनी संपूर्ण महाभारत युद्धाचे संचलन केले. धर्मा विरुद्ध आचरण केल्यामुले दुर्योधन आदि कौरव महायुद्धात मारले गेले आणि कौरव वंशाचा विनाश झाला. श्रीकृष्ण जेंव्हा गांधारीचे सांत्वन करायला गेला तेव्हा शोक संतप्त गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला. ज्याप्रकारे तुझ्यामुळे माझे १०० पुत्र मरण पावले तसा तुझा वंशही एकमेकांशी लढून नष्ट होतील. ३६ वर्षांनंतर गांधारीचा हा शाप खरा ठरला.
काही यदुवंशी तरुणानी दुर्वास ॠषिची चेष्टा केली. एका तरुणाला साड़ी नेसवून “हिला दिवस गेले आहेत. हिला मुलगा की मुलगी काय होईल?’ असे विचारले. त्रिकाल ज्ञानी दुर्वास म्हणाले, ‘हिला मुसळ होईल आणि तेच मुसळ तुमच्या संपूर्ण कुळाचा नाश करील.’ मग मात्र सगले यदुवंशी भयभीत झाले. त्यांनी मुसळाचे बारीक़ तुकडे केले आणि जलाशयात फेकून दिले.या तुकड्यातुन लव्हाळी नावाचे गवत उगवले. नंतर एके दिवशी सगळे यदुवंशी यदुपर्वा निमित्त सोमनाथ जवळच्या प्रभास क्षेत्रांत गेले. पर्वाच्या आनंदात त्यांनी मद्य प्राशान केले आणि त्याच धुंदीत एकमेकांना लव्हाळयांनी मारू लागले. या लढाईत श्रीकृष्ण आणि थोडेच लोक जीवंत राहिले बाकी सगळे यदुवंशी एकमेकांशी लढून मरण पावले.
महाभारतात ‘मुसलपर्व’ नावाचे एक विशेष पर्व आहे यात हा कथाभाग आलेला आहे. गांधारी आणि दुर्वास यांच्या शापामुळे, सगळे यदुवंशी एकमेकांशी लढूनच मृत्युमुखी पडले. यातून वाचलेल्या लोकांनी द्वारका सोडून हस्तिनापुरची वाट धरली. यादवांचे आणि त्यांनी वसविलेल्या गणराज्याचा अंत होताच श्रीकृष्णाने निर्माण केलेली द्वारका समुद्रात बुडाली. आजही समुद्रात बुडालेली द्वारका पाहता येते.त्यावर संशोधन देखील सुरु आहे.
भगवान श्रीकृष्ण आपल्या कुलाचा नाश झालेला पाहून व्यथित झाले. एके दिवशी ते याच प्रभास क्षेत्रांत एका पिंपळाच्या वृक्षाखाली योगनिद्रा घेत निवांत पहुडले होते. त्यावेळी ‘जरा’ नावाच्या एका पारध्याने त्यांना हरीण समजुन एक विषयुक्त बाण मारला. तो त्यांच्या तळपायाच्या आंगठयाला लागला आणि हेच कारण शोधून भगवान श्रीकृष्णाने आपला देहत्याग केला. महाभारताच्या महायुद्धानंतर ३६ वर्षांनी त्यांनी देहत्याग केला.
हे प्रभास क्षेत्र हिन्दुसाठी अतिशय पवित्र तीर्थस्थान आहे. सोमनाथ पासून ५-६ किमी अंतरावर वेरावळ येथे “प्रभास पत्तन” हे स्थान आहे. ‘भालका तीर्थ’ या नावाने हे स्थान प्रसिद्ध आहे. येथील मंदिरांत वृक्षा खाली पहुडलेले श्रीकृष्ण दिसतात आणि त्यांना बाण मारणारा पारधी त्यांच्या समोर हात जोडून उभा आहे. अशी मूर्ती येथे पहायला मिळते.
भगवान श्रीकृष्णाचे चरित्र अगाध आहे. अब्जावधी लोकांना प्रेरणा देणारे आहे. जन्माष्टमी निमित्त लिहिलेली ही लेखमाला भगवान श्रीकृष्णाला अर्पण असो.
एकं शास्त्रं देवकी पुत्र गीतम| एको देवो देवकीपुत्र एव|
एको मन्त्रस्तस्य नामानि यानि|कर्माप्येकम तस्य देवस्य सेवा||
|| श्रीकृष्णार्पनम अस्तु||
Janmashtami Special Article Bhalka Tirtha by Vijay Golesar