निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील वटार गावातील अवघा तीन वर्षाचा चिमुकला स्वराज सर्पदंशामुळे मरण पावला. ज्या दिवशी त्याचा वाढदिवस होता, त्याच दिवशी त्याने प्राण सोडले, ही घटना अत्यंत दु:खद आहे. खेळता बागडता स्वराज निर्ढावलेल्या आणि सुस्त झालेल्या आरोग्य यंत्रणेचा बळी ठरला आहे.
सरकार आरोग्य यंत्रणेवर करोडोंचा खर्च करत असताना, यंत्रणेचे शिलेदारच या कामात हरताळ फासत आहेत. अशा घटना घडतात तेव्हा सुस्तावलेल्या यंत्रणेला खडबडून जाग येते, पण वेळ आणि काळ दोघेही निघून गेलेले असतात. त्यानंतर फक्त कागदोपत्री चौकशी होते, आणि दोषी अधिकारी निर्दोष ठरतात. पण, ज्या कुटुंबाने आपला प्रियजन गमावला, त्यांना न्याय देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे?
तालुक्यात आरोग्य सेवा देण्यासाठी ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे ५१ उपकेंद्र आणि तीन ग्रामीण रुग्णालये आहेत. अनेक गावात उपकेंद्रे आहेत, ज्यांना आरोग्यवर्धिनीमधून वैद्यकीय अधिकारी दिले आहेत. प्रत्यक्षात किती वैद्यकीय सेवक (काही अपवादात्मक कर्मचारी सोडले तर) रात्रभर गरजू लोकांना सेवा देतात, हा संशोधनाचा विषय आहे.
अनेक वेळा गर्भवती माता, श्वान दंश, सर्पदंशाच्या प्रकरणांत तातडीची मदत मिळत नाही. पण, यंत्रणेच्या विरोधात कोणीही बोलायला पुढे येत नाही. अशा अकस्मात घटना घडतात तेव्हा सर्व मागच्या पुढच्या गोष्टींना वाचा फुटते. शासनाचे मुख्यालयी राहण्याचे कडक आदेश असतानाही, त्याचे पालन कितपत होते हे पाहणे वरिष्ठ अधिकारी यांचे काम आहे. पण, जर वरिष्ठच गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या या अधिकारी-कर्मचा-यांना पाठबळ देत असतील, तर सर्वसामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची आणि का?
स्वराजचा मृत्यू हा लस उपलब्ध असूनही झाला. लस असून उपयोग नाही, कारण तिचा विनियोग करणारा जागेवर असला पाहिजे. मुलाचा मृत्यू डोळ्यासमोर पाहणारा बाप विरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील यंत्रणेला उठवतो, कोणी तरी एकजण रुग्णालयात डोळे चोळत समोर येतो आणि सांगतो डॉ. नाहीत, तुम्ही याला सटाण्याला घेऊन जा. अशा वेळी हतबल बाप आणि स्वराज कुठलाही विलंब न करता सटाणा कडे जातात, पण वेळ निघून गेलेली असते. स्वराजच्या मृत्युला कारणीभूत घटकांना आधी निलंबित करा, मग चौकशी करा, अशी मागणी आता सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
स्वराजचा मृत्यू आरोग्य यंत्रणेतील दुर्लक्षामुळे झाला आहे. अशा घटना टाळण्यासाठी तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. यंत्रणेला आत्मपरीक्षण करणे आणि सुधारणा करणे गरजेचे आहे.