मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीनंतर परदेशात गेल्यानंतर त्यावर विरोधकांनी बरीच टीका केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक व्हिडिओ शेअर करत चिमटा काढला आहे.
या व्हिडिओ बरोबर टाकलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, परदेशी कशाला जायाचं..गड्या आपला गाव बरा शेत पिकाची दुनिया न्यारी…वसे जिथे विठूरायाची पंढरी… लोकसभा निवडणुकीच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून महाबळेश्वर तालुक्यातील दरे या माझ्या मूळ गावी जाऊन थोडा विसावा घेतला.
यावेळी शेतशिवारात फेरफटका मारून शेती आणि मातीची पाहणी केली. जीवाला जीव देणाऱ्या गाई गुरांची चौकशी करून त्यांना प्रेमाने दोन घास खाऊ घातले. तसेच शेतात जाऊन चिकू, फणस, सुपारी आणि भाज्यांच्या लागवडीची पाहणी केली. इथली माती माझ्या मनाला शांतता देतेच पण पुन्हा एकदा नव्या जोमाने नवी आव्हाने सर करण्याचे बळही देते.