मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीबीआय प्रकरणांसाठी मुंबईच्या विशेष न्यायाधीशांनी बँक ऑफ बडोदा, वाळकेश्वर रोड शाखा, मुंबई चे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक रामचंद्र श्रीधर जोशी यांना दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये बँकेचे नुकसान केल्याबद्दल अनुक्रमे दोन वर्षे आणि एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसेच ४ लाख ३७ हजाराचा एकत्रित दंड ठोठावला आहे.
पहिल्या प्रकरणात, सीबीआय प्रकरणांसाठी मुंबईचे विशेष न्यायाधीश यांनी बँक ऑफ बडोदा, वाळकेश्वर रोड शाखा, मुंबई चे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक रामचंद्र श्रीधर जोशी यांना ३ लाख रुपयांच्या दंडासह दोन वर्षांची शिक्षा सुनावली. केंद्रीय अन्वेषण विभागाने १२ मे १९९४ रोजी जोशी आणि इतरांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल केला होता. एकूण १०.५० कोटी रुपयांचा (अंदाजे) गैरव्यवहार करून बँक ऑफ बडोदाची फसवणूक करण्यासाठी आरोपीने खाजगी व्यक्तीसोबत गुन्हेगारी कट रचला आणि फसवणुकीच्या मार्गाने सदर रक्कम त्या खाजगी व्यक्तीच्या खात्यात वळती केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे बँकेचे नुकसान झाले आहे .
तपासानंतर २७ डिसेंबर १९९६ रोजी तत्कालीन मुख्य व्यवस्थापक आणि एका खाजगी व्यक्तीसह दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपीला दोषी ठरवले आणि त्यानुसार खटल्यानंतर त्याला शिक्षा सुनावली. खटल्यादरम्यान दुसऱ्या आरोपपत्रातील आरोपी (खाजगी व्यक्ती) चा मृत्यू झाल्यामुळे खटला थांबला.
दुसऱ्या प्रकरणात, सीबीआय प्रकरणांसाठी मुंबईच्या विशेष न्यायाधीशांनी बँक ऑफ बडोदा, वाळकेश्वर रोड शाखा, मुंबई चे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक रामचंद्र श्रीधर जोशी यांना एक वर्षाचा सश्रम कारावास आणि १ लाख ३७ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सीबीआयने जोशी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. ५ कोटी (अंदाजे) रुपयांचा गैरव्यवहार करून बँक ऑफ बडोदाची फसवणूक करण्यासाठी आरोपीने खाजगी व्यक्तीसोबत गुन्हेगारी कट रचला आणि फसवणुकीच्या मार्गाने ही रक्कम त्या खाजगी व्यक्तीच्या खात्यात वळती केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे बँकेचे नुकसान झाले आहे .
तपासानंतर २४ डिसेंबर १९९६ रोजी रामचंद्र श्रीधर जोशी सह चार आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि त्यानुसार त्याला शिक्षा सुनावली. आरोपपत्र दाखल केलेल्या दोन आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाल्यामुळे खटला थांबवण्यात आला तर अन्य आरोपीला दोषमुक्त करण्यात आले होते.