इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्यभरात वटपौर्णिमा साजरी झाली आहे. पण, यानिमित्ताने अभिनेत्री हेमांगी कवी आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोशल मिडियात शेअर केलेली पोस्ट सध्या खुपच गाजते आहे. पारंपरिक पद्धतीने वडाला दोरा बांधणे आणि त्याची पूजा करणे या प्रथेसंदर्भात त्यांनी भाष्य केले आहे. त्यामुळे त्याची सध्या मोठी चर्चा होत आहे. या दोघींनीही त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ….
चाकणकरांची पोस्ट अशी
आज वटपौर्णिमा,दरवर्षी वडाची रोपे लावून ही. पौर्णिमा साजरी करते.आजही सहकुटुंब उपस्थित रहात वृक्षारोपण केले. यावेळी वडाच्या रोपांचे वाटपदेखील करण्यात आले.
लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही,’ असे वक्तव्य मी दोन दिवसांपूर्वी विधवा प्रथा बंदच्या कार्यक्रमात केले होते.
माझ्या या वक्तव्याचे स्वागत आणि अभिनंदन करणारे फोन तसेच मेसेज आले.त्यांचे मी आभार मानते.टिका करणा-यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते.
कारण त्यांच्यामुळे अभ्यासपूर्ण विचारांच्या उंचीचे सातत्य राखता येते.यंदाच्या वर्षी आम्ही सहकुटुंब वृक्षारोपण कार्यक्रमाला उपस्थित राहिलो.माझ्या पतीने वडाचे रोप लावून पूजा केली आणि सात फे-या पूर्ण करुन जन्मोजन्मी ही वैचारिक साथ कायम रहावी म्हणुन प्रार्थना केली.
आज #वटपौर्णिमा..नेहमीप्रमाणे वृक्षारोपण करुन, वडाचे रोप वाटप करुन वटपौर्णिमा साजरी केली.
‘मी वडाच्या झाडाला दोरे बांधून,फे-या मारत नाही किंवा मी वडाचा झाडाची फांदी तोडून कधीही वटपौर्णिमा साजरी करत नाही.(१/२) pic.twitter.com/oQ0UmTui5O— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 14, 2022
ऑक्सिजनचा स्रोत असणा-या वडाचे रोपटे लावणे, रोपवाटप आणि वृक्षसंवर्धन हीच आमची ‘वटपौर्णिमा’.
माझ्या या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला. अनेक मंडळींनी खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शेवटी प्रत्येकावर झालेले संस्कार समोर येतातच.
वटपौर्णिमेला वड पुजून सात जन्म तोच पती मिळावा,अशी प्रार्थना करणा-या महिला आहेत, त्यांची भूमिका आणि भावना आहे. तसेच ज्योतिबा आणि सावित्रीबाईंचा विचार पुढे नेणारा आणि विज्ञानवादी विचार करणाराही एक वर्ग आहे.
मला वड पूजण्यापेक्षा वडाचे,वृक्षांचे संवर्धन करणे अधिक योग्य वाटते.काय योग्य काय अयोग्य याचा विचार ज्याचा त्याने करावा आणि तशी कृती करावी.
हेमांगी कवी म्हणते…
अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मिडियात नेहमी सक्रीय असते. अनेकदा तिच्या पोस्टमुळेही ती चर्चेत असते. आताही तिने वटपौर्णिमेबद्दल पोस्ट टाकली आहे.
नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा त्याच्या नाकी नऊ न आणणं हे जास्त महत्वाचं आणि फलदायी व्रत आहे कुठल्याही बायकोसाठी!
वडाची फांदी तोडून घरी आणून पुजण्यापेक्षा किंवा वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा आपल्या नवऱ्याच्या नावाचं झाड प्रत्येक वर्षी लावलं तर फक्त त्याचंच नाही तर आपलं ही आयुष्य वाढेल कदाचित! काय?
#कवीहूँमैं #हेमांगीकवी #तीसावळीगं #kavihunmain #hemangikavi #thatduskywoman #वटपौर्णिमा #वडपूजन #vatapournima #साताजन्माच्यागोष्टी
त. टी. : यात कुणाच्या ही धार्मिक भावना दुखवायच्या नाहीयेत.
उपवास करायची ज्याची त्याची इच्छा आणि श्रद्धा!
तरीही त्यातून जर कुणी “म्याडम तुमी उपास धरला काय” विचाणाऱ्यांना वाळलेला फणस मिळो!