नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात हार्मोन्स अॅन्ड डायबेटिस क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले आहे. सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील या अद्ययावत केंद्रामध्ये मधुमेह व्यवस्थापनाशी निगडीत सर्वंकश सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये तज्ञांचा सल्ला, डोळ्यांची तपासणी, हृदयरोग तज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, डायबेटिक फूट सर्जन, आहारतज्ञ, मधुमेहाशी निगडीत गुंतागुंतींसाठी चाचण्या यांचा समावेश आहे. हे केंद्र सह्याद्री हॉस्पिटल्स, पुणे येथील हार्मोन्स अॅन्ड डायबेटिस क्लिनिकच्या एंडोक्रिनोलॉजिस्टशी संपर्कात असेल. या केंद्रामध्ये नमुने घेण्यासाठी मोफत सेवा,औषधांची मोफत होम डिलिव्हरी या सेवा प्रदान केल्या जातील.
जगभरात भारत ही मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखली जात असून सुमारे 12% प्रौढ व्यक्ती या मधुमेहाने ग्रस्त आहेत.सह्याद्रि हॉस्पिटल्समधील एंडोक्रिनोलॉजिस्ट व डायबेटोलॉजिस्ट डॉ.उदय फडके म्हणाले की,टाईप 2 मधुमेहाची समस्या ही आता केवळ शहरी भागापुरती मर्यादित राहिली नसून ग्रामीण भागातही दिसून येत आहे. भारतीयांना मधुमेहाचा धोका अधिक आहे. एखाद्या व्यक्तीला मधुमेहाचे निदान झाले की,पुढील व्यवस्थापनासाठी संरचित कार्यक्रम त्या रूग्णाद्वारे अवलंबिला गेला पाहिजे, जे आपल्या येथे सहसा दिसून येत नाही.
या आजाराची लक्षणे सहसा दिसून येत नसणारी,लोकांचे नियमित पाठपुरावा व उपचार करण्याकडे असणारे दुर्लक्ष या कारणांमुळे अनेक गुंतागुंत होण्याची जोखीम वाढू शकते. आमचे उद्दिष्ट मधुमेही रूग्णांसाठी पहिल्यापासूनच उपचारासाठी संरचित कार्यक्रम आणि स्पष्ट आराखडा तयार करणे हे आहे. त्यासाठी आम्ही एकाच छताखाली सर्वसमावेशक सेवा प्रदान करत आहोत. याशिवाय गरज पडल्यास पुण्यातील एंडोक्रिनोलॉजिस्टच्या टीमबरोबर टेलि-कन्सल्टेशन सुविधा देखील उपलब्ध असेल.
उपचारामध्ये सुरूवातीला घेण्यात येणार्या चाचण्यांदरम्यान डोळे,हृदय,मुत्रपिंड,नसा,रक्ताभिसरण आणि पायाच्या आरोग्याची स्थिती याबद्दल जाणून घेतले जाईल. यासंबंधी माहिती उपलब्ध झाल्यानंतर योग्य उपचारांचे नियोजन करण्यात येईल. योग्य पाठपुरावा,अचूक वैद्यकीय परीक्षण आणि उपचार करण्यासाठी रूग्णाची माहिती इलेक्ट्रॉनिक पध्दतीने जमा केली जाईल. नाशिकच्या बाहेरून येणार्या रूग्णांच्या सोयीसाठी लॅबमधून अहवाल येण्यासाठी लागणारा कालावधी कमी केला गेला असून त्यामुळे रूग्णांना त्याच दिवशी आपल्या घरी परत जाता येईल.
तज्ञांच्या टीममध्ये दैनंदिन व्यवस्थापन हे मधुमेह तज्ञ डॉ.भाग्यश्री पाटील व फिजिशियन डॉ.अभिषेक पिंप्राळेकर पाहतील. सह्याद्रि हॉस्पिटल्स नाशिकच्या क्रिटिकल केअर विभागाचे संचालक व प्रसिध्द फुफ्फुस तज्ञ डॉ.भरत त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली या सेवा प्रदान केल्या जातील. तज्ञांच्या टीममध्ये पुण्यातील एंडोक्रिनोलॉजिस्टस डॉ.उदय फडके,डॉ.सजल कामत आणि डॉ.मधुरा करगुप्पीकर हार्मोनशी निगडीत असलेल्या समस्यांसाठी सल्ला देतील.
सह्याद्रि हॉस्पिटल नाशिकचे सहाय्यक उपाध्यक्ष डॉ.संजय चावला म्हणाले की, हार्मोन्स अॅन्ड डायबिटीस क्लिनिक हे नाशिक आणि पुणे येथील तज्ञ डॉक्टरांचे सांघिक कार्य आहे, जिथे आम्ही एकाच छताखाली मधुमेहासाठी सर्वसमावेशक देखभाल सेवा प्रदान करणार आहोत. रूग्णांच्या सोयीकरिता लॅब नुमने मोफत गोळा करणे आणि औषधांची मोफत घरपोच सेवा यासंारख्या सहाय्यक सेवांचा समावेश करण्यात आला आहे.सर्वसमावेशक आणि संरचित उपचार सेवा देण्याबरोबरच लोकांना मधुमेहाबद्दल जागरूक करणे आणि भविष्यातील गुंतागुंत टाळण्यासाठी अधिक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेकडे वाटचाल करण्यास प्रवृत्त करणे हा आमचा उद्देश आहे.
तरूण मधुमेहींची मोठी संख्या ही चिंतेची बाब आहे – डॉ.उदय फडके
एकीकडे भारत मधुमेहाची राजधानी होत असताना तरूण मधुमेहींची मोेठी संख्या ही चिंतेची बाब आहे. इन्शुलिनची जास्त प्रमाणात प्रतिरोधकता,लठ्ठपणा,ए1सी ची पातळी,तुलनेने हृदयाच्या छोट्या रक्तवाहिन्या,शरीराची जडणघडण आणि इतर घटकांमुळे भारतातील मधुमेह हा वेगळा असून त्यामध्ये चिंताजनक वैशिष्ट्ये आहेत.चुकीची जीवनशैली त्यामध्ये खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी,झोपेचा अभाव,व्यायामाचा अभाव या सर्व गोष्टी यात भर पाडत आहेत.अनेक लोकं त्यांच्या तिशीमध्येच उच्च रक्तपातळीसह आमच्याकडे सल्ल्यासाठी येतात.अनेकांना सुरूवातीपासूनच काही ना काहीतरी गुंतागुंत असते आणि नंतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबधी किंवा मुत्रपिंडाच्या समस्या निर्माण होतात.
तरूण वयात मधुमेह हो असल्याने व्यवस्थापन व्यवस्थित न केल्यास गुंतागुंती देखील लवकर होतात.उदा.काही लोकं हृदयाच्या तक्रारी घेऊन येतात,मात्र मुळ कारण हे उच्च रक्ताची पातळी असते,ज्याचे निदान लक्षणे नसल्याने झाले नसते.मधुमेहाबाबत मुळ समस्या ही आहे की,याची लक्षणे आधी दिसून येत नाहीत. लक्षणे नसल्यामुळे साखरेच्या पातळीबाबत किंवा जोखीम असलेल्या अवयवांची नियमित तपासणी होत नाही.हे चित्र बदलले पाहिजे.ज्यांना मधुमेह आहे,त्यांच्यासाठी एक संरचित उपचार कार्यक्रम आखणे गरजेचे आहे,ज्यामध्ये नियमित सल्ला,रक्तातील साखरेच्या तपासण्या,डोळे,हृदय,मुत्रपिंड यांसारख्या अवयवांचे आरोग्य आणि जीवनशैली संबंधित सल्ला याचा समावेश असणे गरजेचे आहे.रूग्णाच्या वैद्यकीय इतिहास व सद्य स्थितीची नोंद व्यवस्थित ठेऊन संघटित मार्गाने पुढे जाणे आवश्यक आहे.असे झाल्यास फक्त त्या त्या वेळी उदभवणार्या लक्षणांनुसार उपचार न करता रूग्णाची पूर्ण वैद्यकीय स्थिती लक्षात घेता उपचार केले जातील.
सामान्य व्यक्तीने साखरेची पातळी कधी तपासावी?
आपल्या देशातील मधुमेहाची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता वयाच्या तिशीमध्ये प्रत्येकाने रक्तातील साखरेची पातळी तपासणे गरजेचे असल्याचे मत डॉ.फडके यांनी व्यक्त केले. गरोदर होऊ इच्छिणार्या महिला,मासिक पाळी अनियमित असणे,लैंगिक क्षमतेचा अभाव,अचानक वजन कमी होणे,थकवा,मुंग्या येणे किंवा कोणतीही वेगळी लक्षणे जाणवत असतील त्यांनी साखरेची पातळी त्वरित तपासणे गरजेेचे आहे. चांगल्या जीवशैलीचा अवलंब करणे हेच आजारांना दूर ठेवण्याची गुरूकिल्ली आहे हे वेगळे सांगायला नको.