अहमदाबाद – ड्रग्ज सारख्या अंमली पदार्थांची तस्करी हा जगभरातील अनेक देशांचा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या काही वर्षात परदेशातून विशेषत: पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर भारतात या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याने समस्या निर्माण होत आहे. विशेष म्हणजे तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यात अडकवून भारताच्या विकासाला खीळ घालण्याचे या परकीय शक्तींच्या कारवाया थांबविण्यासाठी एटीएस कडून विशेष प्रयत्न केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून गुजरातमध्ये एटीएस पथकाने गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करून विशेष कामगिरी बजावली आहे.
गुजरात दहशतवादविरोधी पथकाने ( एटीएस) सन २०१६ पासून आतापर्यंत गेल्या ५ वर्षात १९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले असून त्यापैकी यंदा २०२१ मध्ये ९०० कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या काळात एटीएसने अंमली पदार्थाशी संबंधित काही मोठ्या प्रकरणांमध्ये ७० हून अधिक समाजकंटकांना अटक केली आहे. पाकिस्तानातील तस्कर या विघातक कारवायांसाठी गुजरातच्या किनारपट्टीचा वापर वापर करत आहेत. कारण आपल्याकडे १,६००किमीचा समुद्रकिनारा आहे, त्यामुळे हे साध्य करण्यासाठी सर्व दहशतवादी यंत्रणा समन्वयाने हे विघातक काम करतात.
विशेषत: गेल्या ४ वर्षांत मादक द्रव्ये विशिष्ठ ठिकाणी नेण्यासाठी खूप प्रयत्न झाले, परंतु असे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यात आले. यावर्षी विविध कारवायांमध्ये ९०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आल्याचे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच यामध्ये मोरबी जिल्ह्यातून रविवारी जप्त केलेल्या ६०० कोटी रुपयांच्या १२० किलो ड्रग्ज सह अन्य साहित्याचा यात समावेश आहे, हा साठा एका पाकिस्तानी तस्कराने पाठवला होता आणि समुद्रमार्गे गुजरातच्या किनारपट्टीवर आणला होता, असेही ते म्हणाले.
२०१६ पासून एटीएस पथकाने हेरॉईन, मॅन्ड्रेक्स, मेथॅम्फेटामाइन किंवा एमडी, चरस आणि ब्राऊन शुगरसह विविध अंमली पदार्थ जप्त केले आहेत, या वर्षी सप्टेंबरमध्ये, एटीएसने, भारतीय तटरक्षक दलासोबत केलेल्या संयुक्त कारवाईत, गुजरात किनार्याजवळील अरबी समुद्रात इराणी मासेमारी बोटीने आणलेले १५० कोटी रुपये किमतीचे ३० किलो हेरॉईन जप्त केले.
गुजरात एटीएसचे उपमहानिरीक्षक हिमांशू शुक्ला यांनी सांगितले की, पाकिस्तानी ड्रग तस्कर हे गुजरातच्या किनारपट्टीचा वापर तस्करीच्या उद्देशाने गुप्त मार्ग म्हणून करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांचे सर्व प्रयत्न राज्य पोलीस आणि तटरक्षक दलाने हाणून पाडले आहेत. आणि भविष्यातही असा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असेही ते म्हणाले. एटीएस, आयसीजी आणि सागरी पोलिसांनी समुद्रात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत.