गिरणार पर्वत यात्रा अनुभव
काही गोष्टी मनाच्या कोपऱ्यात कायम घर करून असतात. त्याचा ध्यास आपल्याला सतत लागलेला असतो. असाच मनाशी लागलेला ध्यास म्हणजे गिरनार येथील श्री दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन. माझ्या मिस्टरांची उत्कंठाअनेक वर्षापासून वाढतच होती, त्यांच्या मनात गिरनारला जायचेच हा विचार नेहमीच रेंगाळत असे. मनात आले आणि निघालो दर्शनाला, असे हे स्थान नक्कीच नाही असे वाटत होते. अखेर आमची गिरणार पर्वत यात्रा सुखरुप झाली. त्याचेच हे अनुभव कथन…
कोणीतरी सोबत हवे व तो जाणकारही असावा. दत्तप्रभूंच्या कृपेने आम्हाला श्री. मंदार उपासनी यांच्या ग्रुपची माहिती मिळाली. दि. 25 डिसेंबर 2021 रोजी गिरणार दर्शनाला जायचे हे निश्चित करण्यात आले. जसे जसे दिवस जवळ येत होते तशी आमची तयारी होत होती. यात चालणे, पायऱ्या चढणे याचा सरावही होता. मनासारखी शॉपिंगही करून झाली. आणि अचानकच omicron ने महाराष्ट्र व गुजरात येथेही दार ठोठावले.
आम्हा उभयतांचे लसीकरण झालेले आहे. पण मुलीचे लसीकरण अद्याप बाकी आहे या कारणास्तव आम्ही ट्रीप कॅन्सल केली. आयोजकांना व बरोबर सोबत येणाऱ्या आई-वडील , बहिणीला याबाबत कळविले. मागच्या वर्षीही गिरणार दर्शन ही ट्रिप प्लॅन केली होती पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हा प्लॅन रहित करण्यात आला. पण ह्या वेळेस आम्हाला दत्तप्रभूंचे बोलावणे आले होते. म्हणून 8 दिवसांच्या फेरविचारानंतर आम्ही दर्शनाला जाण्याचे निश्चित केले. योगायोग म्हणजे यावर्षी मिस्टरांचे गुरुचरित्र वाचण्याचे 21 वे वर्ष आणि गुरु पादुका दर्शन याचा एक अनोखा मेळ जमून आला!
25 डिसेंबरला कडाक्याच्या थंडीत आम्ही पंचवटी एक्सप्रेसने मुंबईला पोहोचलो. तेथून वेरावल एक्सप्रेसने आम्ही जुनागड येथे निघालो. दत्त दर्शनाला मन अधीर झाले होते. कधी एकदा पहाट होते आणि आपण रेल्वेतून उतरतो असे झाले होते. मनोवेगाने तर मी कधीच गिरणारला पोहोचले होते. पहाटे जुनागढला उतरून सर्वजण गोरक्षनाथ आश्रम येथे पोहोचलो. आश्रमात जाता जाता बस मधून गिरणार पर्वताचे प्रथम दर्शन झाले. उद्या सकाळीच आपण या पर्वतावर असू या विचाराने अंगावर रोमांच उभे राहिले.
आश्रमातील रूम ताब्यात घेऊन सर्वजण फ्रेश झाल्यावर आम्ही श्री सोमनाथ दर्शनास निघालो. आता माझ्या मनात असलेली शंकराविषयी भक्ती, प्रेम हे आपल्याला वेगळे सांगायची गरज नाही. इंडिया दर्पणमध्ये श्री विजय गोळेसर यांनी पंचकेदार या लेखमालेत याचा उल्लेख केल्याने येथे उल्लेख करणे टाळते. साधारणतः दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही सोमनाथला पोहोचलो. भोलेबाबा च्या दर्शनाने मनाला एक अपूर्व शांतता लाभली.
महादेवाच्या शृंगारलेल्या पिंडीकडे बघताना भास होत होता की महादेव म्हणत आहे, “काही काळजी करू नकोस मी येणारच आहे तुमच्या सोबत गिरनारला!!” अंगावर रोमांच उमटणे म्हणजे काय ! याची प्रचिती ‘याची देही याची डोळा’ आली. मनातल्या शंकांना पूर्णविराम मिळाला. जाता-जाता त्रिवेणी संगमाचे दर्शन घेतले मन प्रसन्न झाले. त्यानंतर प्रभास तीर्थ येथील मनमोहक श्रीकृष्ण मूर्ती पाहून मूर्तीच्या जवळ जाण्याचा व कृष्णाला स्पर्श करण्याचा मोह अनिवार झाला पण नेत्र सुखावर मनाला समाधान मानावे लागले. गोलोकधाम येथे गीता मंदिराचे दर्शन घेतले. या सर्व प्रवासात आम्हाला असंख्य गोमातेचे दर्शन घडत होते. सवत्स धेनु चे दर्शन आम्हाला गिरनार दर्शनाचे शुभशकुन देत होते. रूमवर पोहोचेस्तवर साधारणता रात्रीचे 11 वाजले. त्यामुळे रात्रीच गिरनारपर्वत चढणे आम्ही रहित केले व सकाळी रोपवे ने अर्धा टप्पा पार करावा असा बेत ठरविला.
सकाळी 5.30 वाजता आम्ही चहा पाणी घेऊन लम्बे हनुमानाचे दर्शन घेतले. गिरनार चढाईसाठी शक्तीचे साकडे हनुमानाच्या चरणी घातले. रोपवे ने जाण्याचे ठरविले असले तरी प्रथम पायरीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही पायथ्याशी आलो. सोमवार असल्याकारणाने नारळ न वाढविता अर्पण केला. प्रथम पायरी पाहून परत माझ्या मनाचा निश्चय डळमळीत व्हायला लागला .आपण पहिल्यापासूनच चढून जावे अशी तीव्र इच्छा होत होती पण परत पुढच्या वर्षी आपण निवांत येऊ, आधी एक दिवस आराम करून प्रथम पायरी पासून चढून जाऊ असे आम्ही दोघांनी मनाला समजाविले व रोप-वे कडे प्रयाण केले.
तेथील व्यवस्थापन- यंत्रणा पाहून मन अगदीच भारावून गेले , ज्या महान व्यक्तीच्या डोक्यातून ही संकल्पना आली त्या व्यक्तिमत्वाला माझे शतश: प्रणाम. तिकीट काढून आम्ही ट्रॉलीत बसलो तेव्हा साधारणता सकाळचे 6.15 झाले असतील. अंधार, प्रचंड धुके यातून चाललेली ट्रॉली अस्पष्ट दिसणारे डोंगर, जंगल , मधूनच दिसणाऱ्या गिरणार च्या पायऱ्या माझं मन कातर करत होत्या. ट्रॉलीमध्ये आमच्या सोबत एक डोली वाला होता, त्यांचे कष्ट पाहून त्यांनाच वंदन करावे असे वाटले , कारण जरी ते त्यांच्या कामाचा मोबदला घेत असले तरी ते फार पुण्याचे व प्रचंड मेहनतीचे काम करतात. जिथे स्वतःचेच वजन आपल्याला पेलवत नाही तेथे जबाबदारी ने दुसऱ्याला वाहून नेणे कठिणच.
खरंच त्यांच्या कार्याला सलाम! अवघ्या 8 मिनिटात आम्ही 5,500 पायऱ्या पार केल्या, विज्ञान आज तरी मला फक्त आणि फक्त वरदानच वाटत होते! पायऱ्या चढण्यापूर्वी आम्ही घोरकष्टोधरण स्तोत्रा चे पठण केले. पायरीवर नतमस्तक होऊन दत्त गुरूंवर सर्व भार टाकून आम्ही चढते झालो. सकाळी अंबामातेचे मंदिर बंद असल्याने येताना दर्शन घेऊ असे ठरवून मार्गस्थ झालो. हसत खेळत पायऱ्या चढल्या जात होत्या. अचानक मध्ये पाप-पुण्य गुंफा लागली, त्यातून रांगत बसत जात असताना बालपणीचा काळ डोळ्यासमोर आला.
गिरणार चढताना हा आपला हा परका ही भावनाच लोप पावते . एखादी अनोळखी व्यक्ती जेव्हा आपल्याकडे पाहून स्मित हास्य करते, भरभरून बोलते. एकमेकांना ‘जय गिरनारी’ म्हणून प्रोत्साहन देते, तेव्हा माणसातील अहंकाराच्या भिंती कधी गळून पडतात हे आपल्यालाही समजत नाही. गिरणार दर्शनासाठी ग्रुपच हवा ही माझी कल्पना येथे धुळीस मिळाली. कारण समस्त भक्त हा मोठा परिवार आहे येथे मी- तू या भावनेला थाराच नाही. वाटेत आम्हाला एक दिगंबर साधु दिसले, आम्ही मनोभावे त्यांचे दर्शन घेतले. आणि विशेष म्हणजे त्यांचे दर्शन केवळ काही क्षणासाठी झाले आणि मागून येना-या अथवा पुढे असलेल्या पैकी कोणी असे साधू पाहिले असे सांगितले नाही. खरंच गिरनार पर्वताची पायरी चढल्यावर वासना, घृणा, किळस या भावना तेथे लोप पावतात. उरतो तो निखळ आनंद, समाधान…
“जय गिरणारी” च्या घोषात कधी गोरखनाथ टुंक आले हे समजलेच नाही. मंदिरात जाऊन दर्शन घेतले तेथे धुनीच्या भस्माचा प्रसाद मिळाला. सोमवार असल्याकारणाने स्वयंप्रकाशित धुनीचा अनुभव घेण्यासाठी आम्ही कमंडलू तीर्थ येथे प्रयाण केले. तेथील मंदिरात मनोहर दत्त मूर्तीचे दर्शन घेतले. रस ढोकळा व शिरा या प्रसादाचे सेवन करून धुनी दर्शन घेऊन गुरु शिखराकडे मार्गक्रमण केले. असंख्य भाविकां प्रमाणेच आम्हालाही मार्गात एका श्वानाचे दर्शन घडले. संथ व सावकाश आम्ही सतत चालत होतो. मनात अखंड गुरु दत्तांचा जप सुरू होता.
परतणारे भाविक सांगत होते आता थोडेच अंतर राहिले आहे,आता तुम्हाला दर्शन घडेल हे ऐकून हुरूप वाढत होता. मनाला आवर घालने कठीण होत होते. दर्शनाचीच आस मनाला असते त्यामुळे आपण भरपूर चॉकलेट्स, सुकामेवा असे काय- काय पदार्थ घेतले असले तरीही पाणी आणि एनर्जी म्हणून ग्लुकोज याशिवाय दुसऱ्या कशाचीही गरजच भासत नाही. आता परत ही गोष्ट व्यक्ती सापेक्ष आहे. वाटेत काही लहान मुले कंटाळत होती, काही रडत होती तर एक चार ते पाच वर्षाचा मुलगा मात्र “माझ्यात खूप शक्तीआहे, एनर्जी आहे.” असे ओरडत चालला होता त्यामुळे सर्वच भाविकांना त्याची पॉझिटिव्ह एनर्जी मिळत होती.
जसजशी एक एक पायरी मागे टाकली जात होती तस तसे मन व शरीर हलकं होतंय ही अनुभूती येत होती. एक अनामिक शक्ति आपल्या सोबत आहे याचा प्रत्यय येत होता. सोमनाथला म्हटल्याप्रमाणे खरच माझे भोले बाबा आमच्या सोबत येत होते, आता शेवटचा टप्पा नजरेत आला, तेव्हा कधी एकदा पादुका दर्शन होते ही मनाला आस लागली. दत्तमूर्ती व पादुकांचे दर्शन यांचा अनुभव शब्दात बांधणे अवघडच नाही तर अशक्य आहे. दर्शन झाल्यावर भावना डोळ्यावाटे पाझरतात.
बर्याच वेळाने आईकडे गेल्यावर तान्ह्या मुलाचे जे भाव असतात तेच आम्ही अनुभवत होतो. दर्शनाने मन स्थिर होते, मोह- माया सर्व विकार गळून पडतात, अहंकार लुप्त होतो. सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर आपल्या अगदीच निकट आहे ही जाणीव काही औरच! “गिरणार वारी कधीच रिकामी जाणार नाही ” या ओळीचा प्रत्यय आज अनुभवता येत होता. दर्शनाच्या अनुभवाचे गारुड मनावर एवढे प्रचंड आहे की, यापुढे शब्दांकन करणे म्हणजे केवळ लेखन प्रपंच. म्हणून येथेच पूर्णविराम.
ॐ गुरुदेवदत्त अवधूत मारग सिद्ध चौरासी तपस्या करे,
श्री भेष कियो शंभू टेक कारण गुरुजी शिखरपर तप करे,
ॐ गुरु दत्तात्रेय गिरनार मे जप करे, अलखजी माहुर गढ़ राज करे!
शिवशंकर जी कैलाश मे ध्यान धरे…