मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अति उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास कृषी विभागामार्फत मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. दरवर्षी प्रमाणे सन 2021 साठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांकडून वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत, असे कृषी विभागाने सांगितले आहे.
पुरस्काराचे स्वरूप असे : 11 हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार. देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या- 40 (यासाठी प्रति जिल्हा 01 याप्रमाणे सर्वसाधारण गटासाठी 34 आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग एक याप्रमाणे सहा असे एकूण 40). पुरस्काराचे निकष असे : शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर शेती असावी आणि कुटुंबीयांसह त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय असावा. प्रस्तावित शेतकरी हा एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणारा म्हणजेच यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, गोबर गॅस, दुग्ध व्यवसाय, गांडूळ खत युनिट इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा असावा. प्रस्तावित शेतकरी केंद्र/ राज्य शासकीय / निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेत नोकरी करत नसावा किंवा सेवानिवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारा नसावा.
प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे : सातबारा व आठ- ‘अ’ उतारा, केंद्र, राज्य शासकीय, निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेत नोकरी करत नसल्याबाबत तसेच सेवानिवृत्ती वेतन व मानधन घेत नसल्याबाबदचे स्वयंघोषणापत्र, मूळ प्रतितील पोलिस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, आदिवासी गटासाठी जातीचा दाखला, मिळालेले पुरस्कार व कृषी विषयक कार्य दर्शविणारे प्रमाणपत्रे, पीक स्पर्धा, कृषी प्रदर्शने, संशोधन संस्थांना भेटी इ. उपक्रमात सहभागी झाल्याबाबतचा तपशील. नाशिक विभागातील पात्र इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार
महाराष्ट्र राज्य कृषी उत्पादन व कृषी उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र, वाढीव उत्पादनासाठी शेतकऱ्यांमार्फत मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वापर होत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती, कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, जमिनीचा खराब होत जाणारा पोत यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी तुलनेने कमी खर्चिक अशा प्रदूषणमुक्त व रसायनमुक्त सेंद्रिय शेतीकडे वळणे गरजेचे आहे. यालाच प्रोत्साहन म्हणून राज्यात सेंद्रिय शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी अथवा संस्थेला कृषी विभागामार्फत मा. राज्यपाल महोदयांच्या हस्ते कृषी भूषण (सेंद्रिय शेती) हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. दरवर्षी प्रमाणे सन 2021 साठी कृषी विभागामार्फत शेतकरी अथवा संस्थांकडून कृषी भूषण (सेंद्रिय शेती) या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
पुरस्काराचे स्वरूप : 50 हजार रुपये रकमेचा धनादेश, स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक / पतीसह सत्कार. देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या- 08 (प्रत्येक कृषी विभागातून एक याप्रमाणे), पुरस्काराचे निकष : सेंद्रिय शेतीचे पीजीएस किंवा अन्य मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणीकरण केलेले असावे. संबंधित शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण घेतलेले असावे. त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती पद्धतीचा किमान पाच वर्षे अवलंब केलेला असावा. प्रस्तावित शेतकरी स्वतः सेंद्रिय शेती गट, कार्यशाळा, प्रदर्शनांद्वारे सेंद्रिय शेतीचा प्रचार व प्रसिद्धी करणारा तसेच सेंद्रिय शेतीमालास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नेतृत्व करणारा असावा. प्रस्तावित शेतकरी गांडूळ खत, बायोडायनिक कंपोस्ट, दशपर्णी अर्क, जीवामृत, बिजामृत, निंबोळी अर्क, निंबोळी पावडर यासारख्या सेंद्रिय निविष्ठा स्वतःच्या शेतावर तयार करून त्याचा वापर करणारा असावा. शासनाच्या कृषी विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय दोन पुरस्कारांमधील अंतर किमान तीन वर्ष असावे.
प्रस्तावित शेतकरी केंद्र / राज्य शासकीय / निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसावा किंवा सेवानिवृत्ती वेतन किंवा कोणत्याही प्रकारचे नियमित मानधन घेणारा नसावा. संस्थेसाठीचे निकष : संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेकडे असलेले तांत्रिक मनुष्यबळ, त्यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव, अवगत केलेले तंत्रज्ञान व घेतलेली प्रशिक्षणे याबाबत माहिती सादर करावी. संस्थेने सेंद्रिय शेतीमाल विक्री व्यवस्थेत भरीव कामगिरी केलेली असावी. संस्थेचे कार्यक्षेत्र दर्शवणारी व संस्थेशी संलग्न इतर संस्थांची माहिती असावी. संस्थेची सभासद संख्या, संस्थेचा उद्देश, घटना व नियमावली इत्यादी बाबत माहिती असावी. प्रस्तावासोबत आवश्यक कागदपत्रे : सातबारा व आठ- ‘अ’चा उतारा, केंद्र /राज्य शासकीय/ निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नसल्याबाबत तसेच सेवानिवृत्ती वेतन व मानधन घेत नसल्याबाबदचे स्वयंघोषणापत्र, मूळ प्रतीतील पोलिस अधीक्षक कार्यालयाचा चारित्र्याचा दाखला, मिळालेले पुरस्कार व कृषी विषयक कार्य दर्शविणारे प्रमाणपत्रे, सेंद्रीय पीक स्पर्धा, कृषी प्रदर्शने, कार्यशाळा, चर्चासत्र आदी उपक्रमात सहभागी झाल्याबाबतचा तपशील. नाशिक विभागातील पात्र, इच्छुक शेतकरी व संस्थांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Farmers State Government Award Application Invited