राज्यभरात गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्यासंदर्भातील निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला खरा पण काही तासातच तो विभागाच्या अंगलट आला आहे. सद्यस्थितीत ऑनलाईनद्वारे शाळा सुरू आहेत. मात्र, त्यात प्रचंड अडचणी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात कोविड मुक्त भागातील शाळा सुरू केल्या जाणार असल्याचा आदेश शिक्षण विभागाने सोमवारी काढला होता. कोरोना स्थिती लक्षात घेऊन इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या. शाळा सुरू करताना घ्यावयाची खबरदारी, पालकांची जबाबदारी, विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी अशा सविस्तर सूचना सरकारने देण्यात आल्या. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात असताना शाळा सुरू करण्याची घाई का, अशी टीका सर्वत्र होऊ लागली. अखेर याची दखल घेत शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा आदेश स्थगित केला आहे. त्यामुळे राज्यभरात शिक्षण विभागाच्या या सावळ्या गोंधळाची चर्चा होत आहे.