दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. त्यातच आज सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण तयार होऊन सांयकाळी काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस पडला. या बेमोसमी पावसामुळे द्राक्षबागांसह शेतपिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यात काल काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला तर आज सांयकाळी दिंडोरी तालुक्याच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून या पावसामुळे गहू, हरबरा, पिकांची पेरणी लांबण्याची शक्यता आहे तर उशिरा छाटलेल्या द्राक्षबागाना धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे द्राक्षबागामध्ये फुलॉरो अवस्थेत असणा-या बागामध्ये मणीगळ, घडकुज, तसेच डावणी, भुरी रोगाची लागण होऊन फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तर लवकर छाटणी झालेल्या द्राक्षबागाना कॅक्रिंगचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्याचप्रमाणे कांदा रोपाचे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच पेरणी झालेला गहू पिकामध्ये पाणी साचलेल्यामुळे नुकसान होणार असून गहू पिकावर मावा पडण्याची शक्यता आहे. या बेमोसमी पावसामुळे प्रत्येक वर्षी शेतकरी हैराण झाला असून बळीराजापुढे संकट उभे राहत आहे आधीच परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान झाल्यामुळे हैराण झाला आहे त्यात पुन्हा बेमोसमी पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी निसर्गापुढे हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Dindori Taluka Unseasonal Rainfall Today