मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आजच्या काळात अयोग्य जीवनशैली, अयोग्य आहार, हवामानातील बदल यासह अन्य घटकांमुळे अनेक नवनवीन आजार उद्भवत आहेत. तसेच पूर्वीच्या काळातील आजार देखील वाढत आहेत. परंतु सध्या जगभरात कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार यासारख्या आजारामुळे जगभरातील नागरिक त्रस्त आहेत.
मधुमेह हा दिवसेंदिवस वाढतच आहे. कोणाला जर मधुमेह असेल किंवा लठ्ठपणा असेल तर इतर अनेक गंभीर शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. चुकीची जीवनशैली आणि पोषक आहाराचा अभाव यामुळे देशात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मधुमेहाच्या रुग्णांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते.
एका अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की, टाइप 2 मधुमेह आणि लठ्ठपणा असलेल्या रुग्णांच्या रक्तातील चरबी वाढू शकते, ज्यामुळे त्यांना गंभीर शारीरिक समस्या उद्भवू शकतात. यूकेच्या लीड्स विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात एक अभ्यास केला आहे. अभ्यासाच्या निकालांनुसार, शरीरात उपस्थित असलेल्या रक्तातील चरबीच्या पातळीत वाढ झाल्यामुळे, स्नायूंच्या पेशींची रचना बदलू शकते. त्यामुळे शरीरातील पेशींच्या कार्यावर गंभीर परिणाम होतो.
मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्या रुग्णांनी त्यांच्या रक्तातील चरबीच्या पातळीचे निरीक्षण करावे आणि ते नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून रक्तातील चरबीमुळे शरीराला गंभीर नुकसान होणार नाही, असा सल्ला या अभ्यासात देण्यात आला आहे. रक्तातील चरबीबद्दल आणि मधुमेह आणि लठ्ठपणाने ग्रस्त असलेल्या रुग्णांवरील या अभ्यासाबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाचे दोन प्रकार आहेत, पहिला प्रकार 1 मधुमेह आणि दुसरा प्रकार 2 मधुमेह. जे लोक टाइप 2 मधुमेहाचे रुग्ण आहेत, त्यांच्या शरीराला रक्तातील चरबीचे प्रमाण वाढले की गंभीर नुकसान होऊ लागते. रक्तातील चरबीला ट्रायग्लिसराइड्स म्हणतात. रक्तातील चरबीचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातील सिग्नल पेशी नष्ट होतात आणि रुग्णाची प्रकृती बिघडू लागते. यासोबतच स्नायूंच्या पेशींवर दबाव वाढू लागतो, ज्यामुळे पेशींची स्थितीही बदलते. अशा परिस्थितीत रुग्णांच्या कामावर आणि दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो.
मधुमेहाशिवाय लठ्ठपणाच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांनाही रक्तातील चरबी वाढल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. रक्तातील चरबी वाढल्यामुळे ऊतींचे नुकसान होऊ शकते आणि शरीराच्या अंतर्गत अवयवांवर परिणाम होतो. लठ्ठ लोकांमध्ये रक्तातील चरबी वाढल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका वाढू शकतो.
मधुमेही आणि लठ्ठ रुग्णांमध्ये रक्तातील चरबी वाढणे धोकादायक मानले जाते. अशा परिस्थितीत रक्तातील चरबीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी नियमित सकस आहार घ्यावा आणि आरोग्यासाठी चांगली जीवनशैली अंगीकारली पाहिजे. सामान्य शरीरातील ट्रायग्लिसराइड्सची पातळी 150 mg/dL पेक्षा कमी असावी. रक्तातील चरबी वाढण्याचे कारण म्हणजे मधुमेह आणि चुकीचा आहार होय. अशा रुग्णांची वेळोवेळी तपासणी करावी. रक्तातील चरबीची वाढ रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी साखरेचे सेवन कमी केले पाहिजे. तसेच दारू आणि धूम्रपान टाळणे आवश्यक आहे.