मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
ज्य़ेष्ठ उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. खासकरुन त्यांच्या कारविषयी. त्यांची कार ही मर्सिडीज होती. Mercedes Benz GLC 220 D 4Matic या कारची किंमत ६० लाखांपेक्षा अधिक आहे. या कार मध्ये अनेक सुरक्षा फिचर्स आहेत. शिवाय तब्बल ७ एअरबॅग आहेत. हे सारे असूनही सायरस यांचा जीव का वाचू शकला नाही की या कारमध्ये काही अजून कमी आहे असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत.
एअरबॅगला मर्यादा
सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर मर्सिडीज कारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लक्झरी गाड्यांची सुरक्षा, त्यांचा वेग आणि इतर बाबी आता केंद्रस्थानी आल्या आहेत. मर्सिडीज सारख्या लक्झरी गाड्या सुरक्षित आहेत का? अनेक एअरबॅग असूनही सायरस मिस्त्री यांचा जीव का वाचू शकला नाही, असा प्रश्नही उपस्थित होतो आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर प्रामुख्याने नेमके काय घडले याचा आता शोध सुरू आहे. कार अपघातात एअरबॅग महत्त्वाची भूमिका बजावतात. एअरबॅगमुळे आतापर्यंत अनेक प्रवाशांचा जीव वाचला आहे. किंबहुना त्यासाठीच त्या असतात. पण एअरबॅगलाही मर्यादा आहेत. कार अपघातात एखादी व्यक्ती गाडीच्या बाहेर फेकली गेली, तर एअरबॅगचा उपयोग होत नाही. सायरस मिस्त्री कार अपघातात झालेली धडक इतकी भीषण होती, की ड्रायव्हरला ब्रेक लावण्याचाही वेळ मिळाला की नाही का? अशा शंका उपस्थित केली जात आहे.
आता सहा एअरबॅग सक्ती
सर्व कार्समध्ये सहा एअरबॅग्स देणे अनिवार्य करणार असल्याची घोषणा काही महिन्यांपूर्वीच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केल्यापासून एअरबॅग्सची मोठी चर्चा ऐकायला मिळते. दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातात जीव गमावतात. भारतातील रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जगातील सरासरीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. नितीन गडकरींनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार जगातल्या एकूण वाहनांपैकी केवळ १ टक्के वाहने भारतात आहेत. मात्र जगात जितक्या नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, त्यापैकी १० टक्के मृत्यू हे एकट्या भारतात होतात. भारतात विकल्या जाणाऱ्या कार अधिक सुरक्षित करण्यावर केंद्र सरकार भर देत आहे. अपघात झाल्यास एअरबॅग ताबडतोब उघडतात आणि गाडीच्या चालकासह प्रवाशांचे प्राण वाचवतात.
एअरबॅग अशी काम करते
एखादी कार दुसऱ्या वाहनाला, झाडाला, भिंतीला धडकते तेव्हा अचानक कारचा वेग कमी होतो. वेगातील हा अचानक झालेला बदल एक्सीलरोमीटर ओळखतो. यानंतर, एक्सीलरोमीटर एअरबॅगच्या सर्किटमध्ये सेन्सर सक्रिय करतो. एअरबॅग सर्किट सेन्सर अॅक्टिव्ह होताच हीटिंग एलीमेंटद्वारे करंट म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट होतो. त्यामुळे एक स्फोट होऊन एअरबॅग्समध्ये गॅस तयार होतो. ज्यामुळे कंपनीने एअरबॅग म्हणून वापरलेली नायलॉनजी पिशवी फुगते. या पिशवीमुळे चालक किंवा इतर प्रवाशी कारचं स्टीयरिंग, समोरची काच किंवा सीटवर आदळत नाहीत. तसेच एअरबॅगमध्ये श्वास कोंडला जातो का किंवा गुदमरायला होतं का, अशी शंका कुणालाही येऊ शकते. पण असं होत नाही. कारण एअरबॅग एका फुग्यासारखं काम करते. तसेच एअरबॅगमध्ये इनहर्ट गॅस असतो. याने कोणतंही नुकसान होतं नाही. वास्तविक अपघातात प्रवाशांना डॅशबोर्ड किंवा बाजूला धडक बसण्यापासून रोखण्याचं काम एअरबॅग करते आणि प्रवाशाला पुन्हा सीटच्या दिशेने ढकलते, असं तज्ज्ञ सांगतात.
सीटबेल्ट महत्त्वाचा
विशेष म्हणजे चालक आणि त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाने सीटबेल्ट देखील लावला असेल तर तो अधिक सुरक्षित राहतो. एअर बॅग कारच्या समोरच्या भागात लावलेली पिशवी असते. अॅक्सिडेंटच्या वेळी वाहन एखाद्या वस्तूवर किंवा भिंतीवर आदळल्यास प्रवाशी पुढच्या सीटवर आदळतात. पण सेंसरच्या साहाय्याने एअर बॅग काही क्षणातच ही पिशवी फुगवून पुढे आदळल्याने होणारी इजा कमी करण्यात मदत करते. एअर बॅग किटमध्ये एक सेंसर असते, जे बॅग फुलविण्यासाठी संकेत देते. तसेच बॅग तेव्हा फुलते जेव्हा धडकण्याचा फोर्स, १६ किमी गतीने चाललेल्या कारच्या विटेच्या भिंतीला धडकण्याच्या फोर्सच्या समान असतो. तसेच हा फोर्स कारच्या वेगळ्या वेगळ्या भागात लागलेले मेकॅनिकल स्विच ऑफ करतो, तसेच कारचा इलेक्ट्रिक सर्किट तुटून जातो. हे तुटल्याक्षणी सेंसरला अपघाताची सूचना मिळते. आणि बॅगच्या इंफ्लैटरमध्ये सोडियम एजाइड आणि पोटॅशियम नाइट्रेटमध्ये रिऍक्शन होते. या रिऍक्शनमुळे नायट्रोजन गॅसचा निर्माण होतो आणि स्फोटामुळे निर्मित झालेल्या या गॅसने क्षणात बॅग भरते. यात कार्य करणार्या या एअर बॅगमुळे गंभीर दुखापतीपासून संरक्षण होते. सीट बेल्ट लावलेला नसेल तर एअरबॅग उघडत नाही.
Almost all I know don’t fasten seat belt while sitting in the car’s rear. #CyrusMistry was sitting in the rear seat minus the seat belt during collision. This simulation shows what happens to an unbelted rear seat passenger in case of a collision. Please #WearSeatBelt ALWAYS! pic.twitter.com/HjS9weMOT0
— Rajesh Kalra (@rajeshkalra) September 5, 2022
कालचा अपघात, सीटबेल्ट आणि एअरबॅग
एवढ्या मोठ्या उद्योगपतीचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. कारमध्ये बसलेल्या प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेला होता. पण कार अपघाताचा इम्पॅक्ट इतका जबर होता की प्रवाशांना अंतर्गत जखमा झाल्या असाव्यात, असे सांगितले जात आहे. ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला बसलेल्या प्रवाशाचे डोके विंडस्क्रीनला जोरदार धडकले. पण यात कितपत तथ्य आहे, हे चौकशीनंतरच समोर येईल.
वाहन वेग आणि मर्यादा
भारतात हायवे आणि एक्स्प्रेस हायवेवर वाहनांचा वेग किती असावा, याच्या मर्यादा घालून देण्यात आलेल्या आहेत. मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या कारची भारतात वेगमर्यादा ताशी २४० किमी इतकी आहे. सायरस यांची कार नेमकी किती वेगाने धावत होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सायरस यांची कार १२५ ते १५० च्या वेगाने धावत असल्याचा अंदाज आहे. गाडी रस्त्यावर स्कीड झाल्यामुळे किंवा कुणालातरी वाचवण्याच्या नादात अथवा चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असे सांगितले जात आहे.
अपघातानंतर कारमधील काही व्यक्ती कारबाहेर पडल्याचे दिसून आले. त्यामुळे या व्यक्ती कारच्या बाहेर फेकल्या गेल्या की अपघातानंतर ते जीव वाचिण्यासाठी बाहेर पडले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. सायरस हे स्वतःहून जखमी अवस्थेत बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला का, हे तपासानंतरच कळणार आहे. ज्या सुरक्षा भिंतीला कारने जबर धडक दिली, त्या भिंतीचे फारसे नुकसान झाले नाही कारचा मात्र चक्काचूर झाला. मर्सिडीज किंवा बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार अतिशय सुरक्षित मानल्या जातात. पण या गाड्यांना कुणी धडक दिली किंवा या गाड्या एखाद्या ठिकाणी धडकल्या, तर त्यांना काहीच होणार नाही, असे मानणेही चूक ठरेल. कोणत्याही धडकेत गाडीच्या आत बसलेल्या प्रवाशांवर त्यांचा परिणाम हा होतोच. धडक किती जोरात झाली, कोणत्या बाजूला झाली, या सगळ्या गोष्टींवरही अनेक बाबी अवलंबून असतात, असे संबंधित तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
Cyrus Mistry Mercedes Car Accident Airgab’s Safety Features
Mercedes Benz GLC 220 D 4Matic