नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शुक्रवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता देशाला संबोधित करताना ते नेमका कोणता निर्णय जाहीर करतात? याची त्यांच्या भाषणापुर्वी सर्वांनाच उत्सुकता होती. त्यामध्ये कदाचित पंतप्रधान मोदी हे कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लशीकरण मोहीम विषयी बोलतील, अशीही शक्यता व्यक्त करण्यात होती. इतकेच नव्हे तर कोरोनाचा तिसरा डोस कधी देण्यात येईल, असे कदाचित पंतप्रधान जाहीर करतील असे अनेकांना वाटले होते. परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाशिवाय ते काहीच बोलले नाही.
कोरोनाचा तिसरा डोस देण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. कोरोनाचे बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे आणि आणखी अनेक देशांमध्ये यावर विचार केला जात आहे. आता भारतातही दोन डोसांनंतर तिसरा डोस प्लॅन कसा करता येईल. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार असून त्यात हा निर्णय घेतला जाणार आहे. भारतातील कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसबाबत प्रशासन धोरण ठरवू शकते.
भारतात ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा नागरिकांना अतिरिक्त डोस म्हणून कोरोनाचा तिसरा डोस देण्याची चर्चा आहे. याबाबत माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील लसीच्या तिसऱ्या डोसवर धोरणात्मक दस्तऐवज तयार करण्यासाठी तज्ज्ञ गट काम करत आहे. तिसरा कोवीड-१९ लशीचा डोस हा पहिला अतिरिक्त डोस म्हणून शिफारस केला जाऊ शकतो मात्र बूस्टर शॉट म्हणून नाही.
अन्य देशात ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा नागरिकांना अतिरिक्त डोस दिला जातो, तर निरोगी नागरिकांना दुसरा डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनी बूस्टर शॉट दिला जातो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कर्करोगासारख्या रोगामुळे कमी झाली आहे ते दोन-डोस लशीकरणापासून कदाचित फारसे संरक्षित नाहीत. अशावेळी तिसरा डोस देणे महत्त्वाचे असते, असे तज्ज्ञांचे मत आहे.