जळगाव – पांढरे सोने म्हणून ख्याती मिळालेला कापूस आता सध्या चकाकत असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या दोन महिन्यातच पांढऱ्या सोन्याच्या दराने जवळपास दुप्पट मजल मारली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात प्रति क्विंटल २ हजार रुपये असलेला कापसाचा भाव आता ९ हजार ते ९ हजार ५०० रुपयांवर पोहचला आहे. म्हणून कापूस उत्पादकांमध्ये सध्या विशेष आनंदाचे वातावरण आहे.
जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यात कापसाच्या लागवडीचे प्रमाण मोठे आहे. अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे यंदा कापसाचे काय होणार, अशी चिंता उत्पादकांना सतावत होती. तसेच, पावसाच्या काळात कापसाची खरेदीही मंदावली. मात्र, दिवाळीचा सण संपताच आता कापसाच्या दरांनी उसळी घेतली आहे. जळगाव, धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहेत. तसेच, अनेक व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊनही कापूस खरेदी करीत आहेत. कापसाचे दर ९ हजार रुपयांच्या पुढे गेल्याने उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यापुढील काळातही कापसाचे दर ९ हजार रुपयांपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात कापसाची मागणी कायम राहणार असून दर्जेदार कापसाला अधिक दर मिळणार आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकरीही त्यांचे योग्य नियोजन करीत आहेत.