मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर राज्यातील ठाकरे सरकार कोसळले नसते, असे विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. राऊत यांच्या या विधानावर उत्तर देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावरच बोट ठेवले आहे. ‘मी राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळले नसते असे म्हणता तर तुमचे नेतृत्व कमी पडत होते, असे तुम्हाला म्हणायचे आहे का,’ असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला आहे.
मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पटोले यांच्याबाबत केलेल्या विधानाने नवीन वाद उफाळला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना चिमटा काढत नाना पटोले म्हणाले,‘मला शक्तीशाली समजत असल्याबद्दल संजय राऊत यांचे आभार मानतो. मी राहिलो असतो तर खोक्याचे सरकार आले नसते. मी राहिलो असतो तर महाविकास आघाडीचे सरकार राहिले असते. अशा पद्धतीचे वक्तव्य करून त्यांनी माझ्या शक्तीचा देशाला परिचय करून दिला आहे. पण, ज्या पक्षाचे जे कोणी खुर्चीवर बसलेले होते. त्यांचा पक्ष कमजोर होता का? त्या पक्षाचे नेतृत्व कमी पडत होते का, असे संजय राऊत यांना म्हणायचे आहे का, हा प्रश्न निर्माण होतो.’
महागाई, बेरोजगारीचे प्रश्न सोडवा
मला संवैधानिक अधिकार होते. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय केले नाही केले, त्यावर ते बोलत नाहीत. राऊत यांनी हे प्रश्न काढल्याने महागाई, बेरोजगारी आणि शेतीचे प्रश्न निकाली निघणार नाही. राऊतांनी या प्रश्नात लक्ष घालावे, असा टोला पटोले यांनी लगावला.
तो निर्णय हायकमांडचा
मला विधानसभा अध्यक्षपद देण्याचा निर्णय हा सोनिया गांधी यांचा होता. हायकमांडच्या निर्णयावर कोणी प्रश्न उपस्थित करत असेल तर ते योग्य नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले.
Congress Nana Patole Shivsena Sanjay Raut Critic Politics