इंडिया दर्पण विशेष लेखमाला – राऊळी मंदिरी
५१ शक्तिपीठांपैकी एक पावागड कालिका मंदिर
गुजरात मधील सुप्रसिद्ध पावागड़ पहाडावर असलेल्या कालिका देवीच्या मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे वर्षांनंतर ध्वज फडकविला. गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यांत पावागड़ आहे. मंदिरा प्रमाणेच या मंदिराचा इतिहास रोमहर्षक आहे. अतिशय प्राचीन मंदिरांत या मंदिराची गणना केली जाते. पावागड़ पहाडाच्या उंच शिखरावर असलेल्या या मंदिरा पर्यंत पोहचणे अतिशय अवघड होते. तरीही दरवर्षी हजारो भाविक या कालिका मातेचे दर्शन घेतात. विशेष म्हणजे यूनेस्को ने या मंदिराचा समावेश ‘विश्व धरोहर’ मध्ये केला आहे.
पावागड़ येथील कालिका मंदिराचा देवीच्या सुप्रसिद्ध ५१ शक्तिपिठात समावेश केला जातो. देवीच्या या ५१ शक्तिपीठ निर्मिती विषयी तंत्रचुडामणी या ग्रंथात एक प्रसिद्ध कथा आहे. त्यानुसार सतीच्या डाव्या पायाचा अंगठा येथे पडला. त्यामुळे येथे शक्तिस्थळ निर्माण झाले आहे. हे अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे. येथील कालिकादेवी दक्षिणमुखी आहे.त्यामुळे तिची येथे तांत्रिक पूजा केली जाते. दुसऱ्या एका पौराणिक कथेनुसार कालिका देवीला प्रसन्न करण्यासाठी विश्वामित्राने येथे तप केले होते. त्यांनीच येथे कालिकादेवीची स्थापना केली असे म्हणतात. त्यांच्या मुळेच पावागड़ जवळ वाहनार्या नदीला विश्वामित्री असे म्हणतात.
अतिशय दुर्गम ठिकाणी हे मंदिर आहे. प्राचीन गुजरातची राजधानी चंपानेरच्या जवळ आणि वडोदरा पासून सुमारे ५० किमी अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्वी मंदिरा पर्यंत जाणे अतिशय अवघड होते. २०१६ साली आम्ही येथे आलो होतो. त्यावेळी येथे उडनखटोला म्हणजेच रोप-वे ची सुविधा सुरु झालेली होती. डोंगराच्या पायथ्या पासून बसने बर्याच उंचीवर ‘माची’ हे थोड़े सपाट ठिकाण आहे. रात्री आम्ही येथेच जेवण केले. मुक्काम केला.सकाळी सात वाजता रोप-वे सुरु होते. ही रोप -वे माची येथून सुरु होते. रोप-वे ने डोंगराच्या दुसर्या टप्प्यावर पोहचविले जाते. येथून सुमारे २५० पायर्या चढून मंदिरा पर्यंत पोहचता येते.
पंचमहल जिल्ह्यातील पावागड पहाडाच्या सर्वोच्च शिखरावर असलेले हे मंदिर अकराव्या शतकांत बांधलेले होते. पंधराव्या शतकांत मुस्लिम आक्रमक सुल्तान महमूद बेगडा याने चंपानेर वर केलेल्या हल्ल्याच्या वेळी हे मंदिर उध्वस्त केले.एवढच नाही तर कालिका देवीच्या मंदिरावर सदनशाहचा दर्गा देखील बनविला.
गेली पाचशे वर्षे हे मंदिर अशा दुरावस्तेत होते. मंदिराच्या वरील जागा दर्गा प्रबंधन कमिटीच्या ताब्यात होती. त्यामुळे तेथे कोणतेही बांधकाम करता येत नव्हते. मंदिरांत प्रवेश करतांना एका अरुंद जिन्यावरून जीव मुठीत धरून जावे लागत होते. मंदिरात थोडा वेळ बसून भाविक मंदिराच्या वर असलेल्या गच्चीत जायचे. येथे मंदिराला कळस नव्हता की ध्वजस्तंभ नव्हता.अशाही स्थितीत दरवर्षी हजारो भाविक येथे देवीच्या दर्शनाला येत होते.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी दर्गा कमिटीच्या सद्स्यांशी संवाद साधला. त्यांनीही पंतप्रधान मोदींचा शब्द ऐकून कालिका मंदिराच्या वरील जागेचा ताबा सोडला.त्यानंतर पुढील बांधकाम करायला परवानगी मिळाली. या मंदिराची पुनर्निर्मिति दोन टप्प्यात करण्यात आली आहे.या मंदिराचा शिलान्यास पंतप्रधान मोदी यांनी २०१७ मध्ये केला होता. यामध्ये मंदिराच्या आधाराचा विस्तार आणि तीन स्तरांवर ‘परिसर’,’स्ट्रीट लाइट्स’,’सीसीटीवी’ यंत्रणाचा समावेश करण्यात आला.हे सर्व काम पूर्ण झाल्यावर पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी एप्रिल २०२२ मध्ये केले. त्यानंतर दुसर्या टप्प्याचे उद्घाटन दिनांक १७ जून २०२२ रोजी पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते करण्यात आले.
पाचशे वर्षे अतिशय दूरावस्थेत असलेल्या मंदिराचा खर्या अर्थाने कायापालट झाला आहे.पावागडच्या कालिका मातेचे मंदिर आता संपूर्ण वैभवांत,देखण्यारुपांत उभे राहिले आहे. पाचशे वर्षानंतर कालिका मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकविणे ही ऐतिहासिक घटनाच म्हणता येईल. यावेळी मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकविताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ” हा शिखर ध्वज केवळ आमची आस्था आणि अध्यात्माचे प्रतिक नाहीये तर शतकं बदलतात,युगं बदलतात परंतु आस्थांचे शिखर शाश्वत राहते त्याचे हे प्रतिक आहे.”
india darpan special column rauli mandiri pawagarh kalika temple by vijay golesar