इंडिया दर्पण विशेष लेखमाला
निसर्गयात्री
फिल्मी दुनियेतला निसर्गयात्री : माईक पांडे
आजच्या तरुणाईपर्यंत आपला विचार पोचवायचा असेल तर चित्रपट माध्यमासारखं प्रभावी माध्यम नाही. हे वास्तव जाणून ग्रीन चित्रपटांची निर्मिती करणारे, वन्यजीव आणि निसर्ग संवर्धन हा दुर्लक्षित परंतु अत्यंत महत्वाचा विषय चित्रपटांमधून कळकळीने मांडणारे, सलग तीनवेळा ग्रीन ऑस्कर अवॉर्ड प्राप्त झालेले एकमेव भारतीय वन्यजीव चित्रपट निर्माते दिग्दर्शक माईक पांडे. एखादया कळीच्या मुद्द्यावर स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर बदल घडवून आणण्यासाठी चित्रपटमाध्यम किती प्रभाव पाडू शकतं याचा जिवंत पुरावा म्हणजे माईक पांडे यांचे चित्रपट. यांच्याबद्दल जाणून घेऊया आजच्या या लेखात…
चित्रपट हे माध्यम केवळ करमणुकीचं माध्यम नसून समाज शिक्षणाचं प्रभावी माध्यम आहे.मनोरंजन हा या माध्यमाचा प्रमुख हेतू आहेच परंतु, त्याशिवाय या माध्यमाद्वारे समाजातल्या तळागाळातल्या लोकांपासून ते उच्चभ्रू वस्तीतल्या लोकांपर्यंत तुमचा संवेदनशील विचार पोहोचवण्याचं हा सर्वमान्य मार्ग आहे. वेगवेगळ्या दैनंदिन मालिका, वेब सिरीज ,माहितीपट तसेच चित्रपट ,नाटक या माध्यमांचा देशातल्या तरुणाईवर विशेष प्रभाव असतो. चित्रपटांचे नायक नायिका या तरुणाईचे आदर्श असतात.
चित्रपट माध्यम सत्तांतरं घडवू शकतात, चित्रपट माध्यमाद्वारे राजकारणातल्या घडामोडी जनसामान्यांपुढे येतात. चित्रपट माध्यमाद्वारे समाज प्रबोधन होऊ शकतं.चित्रपट माध्यमाद्वारे विविध बायोपिकद्वारे विविध ज्ञातअज्ञात व्यक्तींचं जीवनचरित्र लोकांपर्यंत पोहचतं. हे माध्यम इतिहासातल्या, पुराणातल्या घटना आपल्यापुढे जसेच्या तसे उभं करतं आणि आपल्याला काही क्षण त्या काळाचा साक्षीदार करतं.बॉलिवूड ,हॉलीवूड इंडस्ट्री जगाच्या अर्थकारणात महत्वाची भूमिका बजावत आहे. असंख्य लोकांना छोटा मोठा रोजगार इथे मिळतो.
काहींना अमाप नाव, प्रतिष्ठा,पैसा मिळतो. अप्रत्यक्षरीत्या हे माध्यम समाजाच्या मानसिकतेवर गारुड करून आहेच पण त्याशिवाय इतर सर्वच दृष्टीने जागतिक स्तरावर उलथापालथ घडवून आणायला नक्कीच कारणीभूत आहे. या माध्यमाचा पुरेपूर उपयोग करून घेत माईक पांडे यांच्यासारखे वन्यजीव चित्रपट दिग्दर्शक ,निर्माते मात्र निसर्ग ,पर्यावरण ,वन्यजीव यांच्यासबंधातील सध्या गांभीर्याने घेण्याचे विषय समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा विश्वास आहे की,’ आजच्या तरुणा तरुणाईपर्यंत आपला विचार पोचवायचा असेल तर या माध्यमासारखा उत्कृष्ट माध्यम नाही. सध्याच्या काळात चित्रपट क्षेत्रात ग्रीन चित्रपट निर्मितीची गरज आहे. एखादा चित्रपट बनवण्यासाठी कित्येक विद्युत उपकरणांद्वारे निसर्गातील अपरिमित ऊर्जेचा वापर केला जातो.
जंगलातली चित्रपट दृश्य चित्रित करताना अनेक झाडं, वनस्पतींचे नुकसान होतं. चित्रपट निर्मिती हे विजेवर अवलंबून असलेलं माध्यम आहे.खरंतर चित्रपट उद्योग हा विजेचा सर्वात मोठा ग्राहक आहे, परंतु अनेक निर्माते अत्यंत बेजबाबदार पद्धतीने चित्रपट निर्मिती करतात.जसं की दिवे,एसी, ध्वनी रेकॉर्डर इत्यादी विद्युत उपकरणांना ऊर्जा देण्यासाठी 40 हजार वोल्ट इतक्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेत्यांमध्ये जबाबदार शूटिंग कसं केलं पाहिजे याबद्दलची जागरूकता निर्माण करणं खूप गरजेचं आहे. नैसर्गिक प्रकाशातही शूटिंग करता येतं. शक्यतो,निसर्गाची कोणतीही हानी होऊ न देता नैसर्गिक वातावरणातील शूटिंगतंत्र आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी चित्रपटाचं ग्रीन ऑडिट होणं गरजेचं आहे. चित्रपट करताना निसर्गाचं झालेलं नुकसान,वापरलेली ऊर्जा याचा हिशोब प्रत्येक निर्मात्याकडून मागितला पाहिजे. आपल्याला नैसर्गिक संपत्ती जरी मोफत मिळत असली तरी तिच्या वापराबद्दलची थोडीतरी कृतज्ञता त्यामुळे निर्माण होईल, अशी माईक पांडे यांची मागणी आहे.
माईक पांडे हे भारतीय चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. वन्यजीव आणि पर्यावरण विषयक चित्रपटांमध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. व्हेल,शार्क, हत्ती ,वाघ ,गिधाड ,खेकडे या प्रजातींचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासंदर्भात त्यांनी अनेक माहितीपट तसेच चित्रपट तयार करून जनसामान्यांत यासंदर्भातील जागरूकता निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आत्तापर्यंत 300 हून अधिक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. माईक पांडे यांचा जन्म केनियामध्ये झाला. नैरोबी नॅशनल पार्कच्या अगदी मागच्या बाजूला त्यांचं कुटुंब रहायचं. सात वर्षाचे असताना त्यांच्या काकांनी त्यांना वाढदिवसाला कोड्याक ब्राऊनिंग कॅमेरा भेट दिला आणि तिथून सुरू झाला कॅमेरा आणि माईक पांडे यांचा सहप्रवास.1970 मध्ये नैरोबी येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी त्यांची भेट झाली.
राजीव गांधींनी त्यांना सांगितलं की,”आम्हाला भारतात तुमच्यासारख्या प्रतिभावान माणसाची गरज आहे”. त्यानंतर माईकने भारताचं नागरिकत्व घेतलं आणि मग राजीव गांधी यांच्या आग्रहास्तव माईक पांडे यांच्याकडून दूरदर्शनने ‘अर्थ मॅटर्स’ ही निसर्गमालिका करून घेतली. माईकची दूरचित्रवाणीवरची अर्थ मॅटर्स ही भारतातील वन्यजीव आणि पर्यावरणावरील मालिका खूप लोकप्रिय झाली. त्या मालिकेने मानाचे चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले. ही मुलांसाठी अत्यंत माहितीपूर्ण आणि मजेदार अशी शैक्षणिक मालिका आहे.1973 मध्ये माईकने नवी दिल्लीमध्ये रिवर बँक स्टुडिओची स्थापना केली. ज्याद्वारे त्यांनी निसर्ग आणि वन्यजीव संरक्षण या विषयांवरील चित्रपटनिर्मितीवर लक्ष केंद्रित केलं गेलं.
1994 मध्ये त्यांच्या ‘द लास्ट मायग्रंट , वाइल्ड एलिफंट इन सरगुजा’ या चित्रपटासाठी वाईल्ड स्क्रीन पांडा हा अत्यंत मानाचा ग्रीन ऑस्कर पुरस्कार जिंकणारा तो पहिला आशियाई निर्माता आणि दिग्दर्शक बनला. 2000 मध्ये त्यांच्या ,’शोअर्स ऑफ सायलेन्स, व्हेल शार्क्स इन इंडिया’ या चित्रपटाने दुसऱ्यांदा ग्रीन ऑस्कर पुरस्कार जिंकला. त्यांच्या ‘शोअर्स ऑफ सायलेन्स’ या चित्रपटाची सुरुवात करण्यापूर्वी त्यांना असं आढळलं की दरवर्षी भारतीय किनारपट्टीवर सुमारे बाराशे व्हेल शार्क मारले जातात आणि त्यांचं मास स्थानिक पातळीवर एक रुपये प्रति किलो दराने विकलं जातं.नंतर हेच मांस मासेमारी माफीयांकडून 600 डॉलर किलो दराने आंतरराष्ट्रीय बाजारात विकलं जातं. हेच वाघ, हत्ती, माकडं या इतर प्राण्यांच्या बाबतीतही सर्रास होत असतं. त्यावेळी हा भीषण मुद्दा उचलून धरणारं कोणीच नव्हतं मग, या भीषण प्रकाराला प्रकाशात आणता यावं म्हणून माईक पांडे यांनी ‘शोअर्स ऑफ सायलेन्स’ ही फिल्म बनवली. या चित्रपटाच्या निर्मितीचे विशेष यश म्हणजे या पुरस्काराच्या घोषणेनंतर ‘शोअर्स ऑफ सायलेन्स’ प्रदर्शित झाल्यानंतर तीन महिन्यातच भारताच्या वन्यजीव कायद्यात समुद्री प्राण्यांच्या संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि त्यांना संरक्षण देण्यात आलं. हे या माध्यमाचं खरं यश आहे. त्यानंतर 2005 मध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. 2004 मध्ये ,’ वॅनिशिंग जायंट्स’ या त्यांच्या चित्रपटाला तिसऱ्यांदा ग्रीन ऑस्कर मिळाला आणि त्यांनी हॅट्रिक केली.
भारताच्या चित्रपट सृष्टीसाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट ठरली. त्यांच्या वन्यजीवांप्रती असलेल्या काळजीपोटी आणि त्यांनी केलेल्या चित्रीकरणामुळे भारतात हत्ती पकडण्याच्या क्रूर आणि कालबाह्य तंत्रावरती बंदी घालण्यात आली. अशाप्रकारे अनेक जीव जंतू, किटक, किडे, वन्यप्राणी यांच्या संरक्षणासाठी अभ्यास करून त्यांनी अनेक चित्रपट बनवले आणि ते जागतिक स्तरापर्यंत पोहोचवले. जागतिक वारसा जतन आणि संवर्धनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना 2003 मध्ये सीएमएस UNEP हा पुरस्कार देण्यात आला. माइकने तीन दशकाहून अधिक काळ 600 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले. सध्या ते ‘द रिटर्न ऑफ टायगर ‘या चित्रपटावर काम करत आहेत. ज्याला आवाज देण्याचं काम सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत.
माईक पांडे यांच्या अभ्यासानुसार साधा एखादा कीटक,फुलपाखरू किंवा माशी यांचंदेखील निसर्गाच्या चक्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. हे जीव जंतू जरी दिसायला नगण्य दिसत असले तरी पृथ्वीच्या या विस्तीर्ण पसाऱ्यात त्यांचं एक विशिष्ट स्थान आहे.तेही निसर्ग साखळीचा एक महत्वाचा भाग आहेत. जर ही साखळी तुटली तर मानवाने कधीही कल्पना केल्या नसतील अशा असंख्य समस्या उभ्या राहतील. त्यामुळे निसर्गाचा कोणताही घटक हा दुर्लक्ष करण्यासारखा नाही. कॅलिफोर्निया या देशामध्ये जगातील सर्वात उत्कृष्ट अशी अत्यंत सुपीक जमीन आहे. या जमिनी वरती कित्येक मैल हेक्टर उत्कृष्ट प्रतीच्या बदामाची शेती केली जाते आणि ह्या शेतीसाठी कारणीभूत असतात माशा. या माशांच्या परागीकरणातून उत्कृष्ट प्रतीचे बियाणं उपलब्ध होतं.
काही काळापूर्वी कीटकनाशकांच्या माऱ्यामुळे या माशांची संख्या कमी झाली आणि कॅलिफोर्नियाच्या बदाम उत्पादनावरती लक्षणीय परिणाम झाला.निर्यात बंद करावी लागली. नाईलाजाने त्यांना इतर देशांमधून या माशांची आयात करून मग बदाम शेती पूर्ववत करावी लागली म्हणजे बघा, एक छोटीशी माशी सुद्धा जगाच्या अर्थकारणावरती परिणाम करत असते त्यामुळे आटा केलेलं दुर्लक्ष भविष्यात खूप महागात पडू शकतं. चित्रपट लोकांशी संवाद साधण्यासाठी अत्यंत संवेदनशील भूमिका बजावतात. चित्रपट माध्यम हे पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शनपर असं सशक्त माध्यम आहे. माईक पांडे त्यांच्या चित्रपटांमधून अधोरेखित करतात की हवामान बदल किंवा ग्लोबल वॉर्मिंग हा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा आहे परंतु, नजीकच्या काळात अन्नाची कमतरता आणि पाण्याचे दुर्भिक्ष हे मुद्दे भयंकररीतीने डोकं वर काढतील. सद्यपरिस्थितीत 1.5 बिलियन लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणं दुरापास्त होत
आहे.वीस वर्षानंतर हा आकडा 3.5 बिलियन लोकांपर्यंत जाऊ शकतो.पिण्याच्या पाण्याचा दुर्भिक्ष ही मोठी समस्या जगापुढे उभी राहील. दरवर्षी जगाची लोकसंख्या 7.5 बिलियन इतकी वाढत असते आणि जमिनीचा कस कमी झाल्यामुळे पृथ्वीची अन्न उत्पादकक्षमता मात्र दरवर्षी तीन टक्क्याने कमी होत असते.मग अशावेळी या अतिरिक्त लोकसंख्येला अन्नपुरवठा कुठून होणार ? अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून आपण केवळ प्रगतीच्या मागे दिशेने धावतो आहोत. आपण जंगलासारखा निसर्गाचा एक भाग नष्ट करतो त्यावेळेला निसर्गाचे पूर्ण चक्र विस्कळीत होतं. पण अन्न, पाणी आणि शुद्ध हवा या अतिमूलभुत गरज जर पूर्ण झाल्या नाहीत तर माणसाचं अस्तित्व लवकरच नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.
आपण सोयीस्कररित्या पृथ्वीच्या नैसर्गिक स्त्रोतांकडे दुर्लक्ष करत आहोत. कुठलीही मोफत आणि सहज मिळणाऱ्या गोष्टीकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते.परंतु, भविष्यात त्याची फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे .आपल्या पुढच्या पिढ्यांना मोजावी लागणार आहे नैराश्याकडे जाणाऱ्या आपल्या तरुणाईपुढे चित्रपट माध्यम चांगले आदर्श निर्माण करू शकतात, जगण्यासाठी चांगले ध्येय देऊ शकतात. चित्रपट माध्यमाद्वारे निसर्गाबद्दलची कृतज्ञता म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या पृथ्वीची शोकांतिका लवकरात लवकर पोहोचवता आली पाहिजे, तरच मानव जातीचे अस्तित्व टिकवणं शक्य होईल.
Column Nisargyatri Film Maker Mike Pandey by Smita Saindankar