इंडिया दर्पण विशेष लेखमाला
निसर्गयात्री
अरण्यऋषी : मारुती चितमपल्ली
वर्षानुवर्ष जंगलांच्या सानिध्यात राहणं, जंगलाची अनुभूती घेणं, अरण्यवासी होऊन तिथे संशोधन करणं हे खरंतर कितीही मनापासून इच्छा असली तरी निसर्गाची ओढ असणाऱ्या प्रत्येकाला शक्य होतंच असं नाही. पण,निसर्गभ्रमंतीची प्रचंड आवड आहे तर मग अशा वेळेला मारुती चितमपल्ली यांच्यासारखे निसर्गयात्री आपल्याला या जंगलांची, पक्षी आणि प्राणीविश्वाची त्यांच्या वास्तवदर्शी लिखाणातून मनसोक्त सफर घडवून आणतात.
मारुती चितमपल्ली हे खरोखर अरण्यऋषीच आहेत. जवळजवळ तीन दशकं जंगलांमध्ये संशोधन केल्यानंतर सूक्ष्म निरीक्षणातून मिळवलेलं ज्ञान, मिळवलेला अनुभव ते त्यांच्या लिखाणातून नैसर्गिक, ओघवत्या भाषेत वाचकांपुढे मांडतात आणि प्रत्येक वाचकाला घरबसल्या या अरण्यविश्वाची सफर घडवून आणतात.निसर्गलेखक मारुती चितमपल्ली यांच्या ललित लेखनाने मराठी साहित्यात निसर्ग लेखनाचा बहर आला. निसर्ग आणि माणूस यांच्यातील नात्याचा शोध त्यांच्या लेखनात वेळोवेळी दिसून येतो,म्हणूनच त्यांचा ‘वनविद्येचे तत्त्वज्ञ ललित गद्यकार’ या शब्दात समीक्षकांनी गौरव केला आहे.
मारुती चितमपल्ली हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक आहेत. त्यांचा जन्म सोलापूर मध्ये ५ नोव्हेंबर १९३२रोजी एका गिरणी कामगार कुटुंबात झाला.त्यांची आई सुगंधाबाई म्हणजेच अम्मा आणि त्यांचे मामा हे त्यांचे अरण्यविद्येतले गुरु. लहानपणीच त्यांना जंगलाविषयी ओढ वाटू लागली. त्यांना १८ भाषा अवगत होत्या. ते जर्मन आणि रशियन या परदेशी भाषा देखील शिकले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी संस्कृत भाषेचे अध्ययन केले. महाराष्ट्र शासनाच्या वनविभागात त्यांनी तीस वर्ष सेवा केली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना ते सेवानिवृत्त झाले. कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांचे विशेष योगदान आहे. पक्षीशास्त्रज्ञ डॉक्टर सलीम अली, नरहर कुरुंदकर, व्यंकटेश माडगूळकर आणि गो. नी.दांडेकर यांच्याकडून त्यांना निसर्ग निरीक्षणाची आणि ललित लेखनाची प्रेरणा मिळाली. त्यांनी देशविदेशातील निसर्गविषयक अनेक दुर्मिळ ग्रंथांचा संग्रह केला. त्याचे वाचन केले आणि त्यातून घडत गेले वनअभ्यासक मारुती चितमपल्ली.
चितमपल्ली हे जागतिक कीर्तीचे पक्षीशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक आहेत.परंतु आपलं संशोधन,आपला अभ्यास सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहचावा यासाठी त्यांनी ललित लेखनाचा मार्ग स्वीकारला.मारुती चित्तमपल्ली हे जरी अरण्यअभ्यासक होते तरी त्यांचं लिखाण कुठेही शास्त्रीय माहितीमुळे बोजड झाल्यासारखं वाटत नाही. शास्त्रीय माहितीला ललित लेखनाची जोड दिलेली असल्याने वाचकांना वाचन करताना त्यांचं लिखाण निरस न वाटता रोचक पद्धतीने केलेली निसर्गाची सफर वाटते. हा निसर्गयात्री त्याच्या अनुभवविश्वातून वाचकालाही प्रत्यक्ष जंगलविश्वाची अनुभूती देतो.
चित्तमपल्ली यांची निसर्गविषयावर आतापर्यंत 21 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पक्षी जाय दिगंतरा , जंगलाचं देणं ,रानवाटा ,शब्दांचं धन ,रातवा ,मृगपक्षिशास्त्र ,घरट्यापलीकडे , पाखरमाया , निसर्गवाचन, सुवर्णगरुड , आपल्या भारतातील साप ,आनंददायी बगळे , निळावंती , पक्षिकोश , चैत्रपालवी ,केशराचा पाऊस, ,चकवाचांदण : एक वनोपनिषद , चित्रग्रीव , जंगलाची दुनिया, An Introduction to Mrigpakshishastra of Hansdev, नवेगावबांधचे दिवस ही त्यांची निसर्ग साहित्यसंपदा..
पक्षीजगत हा चितमपल्ली यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. पक्ष्यांच्या आठवणींनी त्यांचे संपूर्ण भावविश्व व्यापलेले आहे. चितमपल्ली यांच्या पक्षीवेडाचे फलित म्हणजे त्यांनी निर्माण केलेला पक्षिकोश हा ग्रंथ. पक्ष्यांची अठरा भाषांमधील नावे त्यांनी या पक्षीकोशात दिली आहेत. ज्या पक्ष्यांची मराठी नावे आढळत नाहीत त्या पक्षांचं त्यांनी नव्याने नामकरणदेखील केले. या पक्षिकोशात त्यांनी जवळपास ४५० पक्ष्यांची माहिती दिली आहे. चितमपल्ली यांच्या लेखनात वैविध्यपूर्ण प्राणिसृष्टीदेखील येते. प्राण्यांची वर्णने आणि त्यांची जीवनशैली यांचे वेधक चित्रण करण्यात त्यांची प्रतिभा रमते. त्यांनी वन्यजीवांची सूक्ष्म निरीक्षणे केलीच पण त्याशिवाय त्यांच्या लिखाणात आदिवासी संस्कृती, त्यांचे निसर्गनिर्भर जीवन आणि त्यांना ज्ञात असलेली सृष्टीची रहस्ये यांचादेखील ऊहापोह आढळतो. त्यांच्या निसर्ग लेखन आणि वन्यजीव अभ्यास या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना तीन वेळा महाराष्ट्र राज्य पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार , दमाणी साहित्य पुरस्कार , फाय फाउंडेशन पुरस्कार , अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचा सन्मान, महाराष्ट्र फाउंडेशनचा गौरव पुरस्कार , वेणू मेमन लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड , नागभूषण पुरस्कार , वसुंधरा सन्मान, भारती विद्यापीठ जीवनसाधना पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले.
१९८७ साली नासिक येथे झालेले पहिले पक्षिमित्र संमेलन, २००० साली औदुंबर येथे झालेले ५७ वे विदर्भ साहित्य संमेलन, २००० साली उमरखेड येथे झालेले ५१ वे विदर्भ साहित्य संमेलन आणि २००६ साली सोलापूर येथे झालेले ७९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – या सर्व संमेलनांच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना लाभला आहे.
निसर्ग म्हणजे चैतन्य. निसर्ग म्हणजे पावित्र्य. मारुती चित्तमपल्ली यांच्यासारख्या निसर्ग लेखकांचं निसर्ग संवर्धनासाठी अप्रत्यक्षरित्या मोठं योगदान आहे.बालवयापासून लहान मुलांमध्ये निसर्ग प्रेमाचं बीज रोवण्याचं काम हे निसर्ग लेखक करत असतात. लहानपणीच जर मुलांच्या वाचनात अशा प्रकारची निसर्गवर्णनं, पक्षी प्राणि प्राणीविश्वातली सूक्ष्म चमत्कारिक निरिक्षणे समोर आली तर पर्यावरण, निसर्ग सृष्टीबद्दलचं कुतूहल बालवयातच जागृत होतं आणि तेव्हापासून लागलेली ही आवड मग पुढे भविष्यात त्यांना शाश्वत जीवनाच्या मार्गावरती घेऊन जाण्यास सहाय्यभूत ठरते. त्यामुळे मारुती चित्तमपल्ली यांच्यासारखे निसर्गलेखक नसते तर कदाचित निम्म्याहुन अधिक समाज ह्या अदभूत निसर्गअनुभूतीला मुकला असता.
Column Nisargayatri Maruti Chitampalli by Smita Saindankar