इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्ग यात्री
प्लास्टिकच्या समस्येवर तोडगा काढणारी मेलाटी
वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी ‘बाय बाय प्लास्टिक बॅग’ या चळवळीची स्थापना करणारी मेलाती विजसेन, इंडोनेशियाच्या बाली प्रांतातली जगातील सर्वात प्रभावशाली तरुण चेंजमेकर्सपैकी एक आहे . ह्या छोट्या पॅकेटने कोणता मोठा धमाका उडवून दिला पाहू या लेखात…
ऐतिहासिक काळातल्या भस्मासुर राक्षसाची गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकली आहे. अत्यंत कडक तपश्चर्या करून त्याने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. या तपश्चर्येच्या जोरावर भस्मासुराने असं वरदान मिळवलं की तो ज्या ज्या वस्तूवर हात ठेवेल ती वस्तू भस्म होईल .भोळा सांब शंकराने भस्मासूराला वरदान दिले खरे परंतु, वरदान मिळताच सर्वात पहिले हा भस्मासुर भगवान शंकरांच्याच डोक्यावरती हात ठेवायला निघाला. हा झाला पुराणातला भस्मासूर पण आधुनिक काळामध्ये आपल्या आजूबाजूला आहे प्लास्टिकरुपी भस्मासूर. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत हे प्लास्टिक आपल्या सोबत असते. अगदी टूथपेस्टपासून, टूथब्रशपासून विचार करायला लागलो तर कितीतरी वस्तू आपल्या डोळ्यासमोर येतात.या सर्व वस्तू खरंतर माणसाने त्याच्या सोयीसाठी बनवल्या. प्लास्टिक वजनाने हलके असते.
पाण्यात कुजत नाही, टिकाऊ असते,लवचिकत असते, दिसायला जास्त आकर्षकही असते आणि मुख्य म्हणजे इतके सगळे गुणधर्म असूनही स्वस्त असते. यामुळे प्लास्टिकचा प्रसार झपाट्याने झाला.अल्पावधीतच प्लास्टिकच्या वस्तुंना लोकप्रियता मिळाली आणि ते मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग कधी झालं हे कळलेदेखील नाही .पण, प्लास्टिक कुजत नसल्याने त्याचे विघटन होत नाही. हजारो वर्ष पृथ्वीवर प्लास्टिक तसंच पडून राहतं. साध्या पाण्याच्या बाटलीचे विघटन होण्यासाठी 100 पेक्षा जास्त वर्ष लागू शकतात. प्लास्टिकच्या पिशव्या,चॉकलेट,कुरकुरे यांचे रॅपर्स हवेत उडून नदी-नाले, समुद्र यात जमा होतात.त्यामुळे पाणी प्रदूषित होतं.तेच पाणी आपण पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरतो.
इंडोनेशिया देशाचा बाली हा नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेला प्रांत. या प्लास्टिकचे त्याला ग्रहण लागले आणि अल्पावधीतच सर्व समुद्रकिनारे प्लास्टिकमय झाले. चहूबाजूला प्लास्टिक च्या पिशव्या, बाटल्या यांचं साम्राज्य पसरलं होतं. त्यावेळी अवघ्या बारा वर्षाच्या मेलातीला ते बघवलं नाही .तीने तीच्या 10 वर्षांच्या लहान बहिणीला इजाबेल विजसेनला सोबत घेऊन या समस्येविरुद्ध लढा द्यायचं ठरवलं. 2013 मध्ये या दोघी बहिणींनी बाली मध्ये ‘बाय बाय प्लास्टिक बॅग’ ही चळवळ चालू केली.पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, ही चळवळ दोघींपुरता मर्यादित राहिली तर आपल्याला जास्त लोकांपर्यंत आपला विचार पोहोचवता येणार नाही.मग त्यांनी त्यांच्या समविचारी अशा मित्र-मैत्रिणींची मदत घेतली.
उत्स्फूर्तपणे या चळवळींमध्ये बाली बेटावरची अनेक मुलं या मोहिमेत सामील झाली. रामाचा सेतू बांधण्यासाठी अशाच वानरसेनेचा मोलाचा वाटा होता. ही सर्व मुलं बालीच्या सर्व समुद्र किनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांना ‘बाय बाय प्लास्टिक बॅग्स’चं महत्व सांगत.त्यांच्याकडील प्लास्टिक बॅग्स जमा करून घेऊन त्याऐवजी कागदी पिशव्यांचं वाटप करत.समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून, अनेक शाळांमध्ये जाऊन, प्रसंगी विमानतळाच्या बाहेर उभे राहून या मुलांनी प्लास्टिक बंदी व्हावी या मागणीसाठी दहा लाख सह्या जमा केल्या आणि तो प्रस्ताव बालीच्या गव्हर्नर पर्यंत पोहोचवला.
बालीच्या गव्हर्नरचं या समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काही दिवस त्यांनी उपोषणाचादेखील मार्ग पत्करला. मेलातीने बाल वयात केलेल्या या अद्भुत कार्याची महती युनायटेड नेशन्स पर्यंत पोहोचली. त्यानंतर तिला युनायटेड नेशन्स अंतर्गत काम करण्याचीदेखील संधी मिळाली. मेलातीने बाली मध्ये 2015 मध्ये ‘वन आयलँड वन व्हॉइस’ या लोक चळवळीची स्थापना केली. सिंगल युज प्लास्टिक वर बंदी आणण्यासाठी सरकारपुढे अनेक पर्याय ठेवले. बालीच्या पर्वतरांगांमधील महिलांच्या सक्षमीकरणासाठी 2017 मध्ये मेलातीने ‘माऊंटन ममा’ ची स्थापना केली.
स्त्रियांना कापडी पिशव्या तयार करण्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले,त्यांच्या प्रशिक्षणाची सोय केलीआणि त्या पिशव्या विक्री करून आलेल्या रकमेपैकी 50 टक्के त्या स्त्रियांचे शिक्षण आणि त्यांच्या आरोग्य विम्यासाठी वापरले. सहा वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर बाली सरकारने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणलीआणि प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणणारा बाली हा पहिला इंडोनेशियन प्रांत ठरला. 2017 मधील ‘फोर्ब्स’च्या यादीत देशातील टॉप टेन प्रेरणादायी महिलांमध्ये तिची निवड झाली.मेलाती म्हणते,” मला वाटतं काही लोक बदल व्हावा अशी फक्त इच्छा व्यक्त करतात. काही लोकांना बदलाची भीती वाटत असते.काही लोक कधीही बदलत नाहीत किंवा बदल स्वीकारत नाहीत. पण कोणताही बदल नको अशी परिस्थिती किंवा चैन आपल्या पिढीला परवडणारी नाही.”
सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मेलाती विजसेन अध्यक्ष आहेत. 2019 मध्ये मेलातीने जगभरातील तरुण चेंजमेकर्सना भेट देण्यासाठी जगभर प्रवास केला. अतिशय लहान वयामध्ये मेलातीने सुरू केलेला हा प्रवास खरोखर धाडसी आणि प्रेरणादायी होता. लहान मुलांमध्ये खूप शक्ती असते आणि जगात एखादा बदल घडवून आणायचा असेल तर या मुलांचा खारुताईचा वाटा देखील हा बदल घडवून आणू शकतो हे मेलातीच्या अथक परिश्रमांतून सिद्ध झाले आहे. मेलाती म्हणते,”Our systems need to be more people centred and impact oriented. Stop teaching people, start engaging people.”
महाराष्ट्रातदेखील 2018 पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आली आहे पण, आपण खरोखर हे नियम पाळतो का हे आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे. 2000 साली एका मेलेल्या व्हेल माशांचं पोट फाडून बघितल्यानंतर त्याच्या पोटात अनेक प्रकारचे कपडे आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोठा गोळा सापडला.किती भयंकर आहे हे !! समुद्राच्या तळाशी जमा झालेल्या या सिंगल युज प्लास्टिकचं प्रमाण इतकं भयंकर आहे की युरोपातील एखाद्या छोट्या देशाच्या आकारमानाएवढी प्लॅस्टिकची बेटं समुद्राच्या तळाशी तयार झाली आहेत.
हळूहळू हे प्लास्टिकचे तुकडे बारीक बारीक होत सूक्ष्म कणांमध्ये रूपांतरित होतात आणि पाण्यातील जीव त्याला अन्न समजून खातात. त्याद्वारे अनेक केमिकल्स या प्राण्यांच्या पोटात जातात. त्यामुळे अनेक जलचर जखमी होतात किंवा मृत्यू पावतात.नजीकच्या काळात माशांपेक्षा जर प्लास्टिकची संख्या समुद्रात जास्त दिसली तर त्यात काही नवल वाटण्यासारखं नाही. माणसाने त्याच्या सोयीसाठी बनवलेला प्लास्टिकरुपी भस्मासूर आज पूर्ण जीवसृष्टीच्या जीवावर उठला आहे. त्याला वेळीच आळा घातला नाही तर अखिल जीवसृष्टी भस्मसात व्हायला वेळ लागणार नाही.
Column Nisarga Yatri Isabel and Melati by Smita Saindankar