इंडिया दर्पण विशेष – नर्मदे हर
दहाव्या दिवसापुढील प्रवास
नर्मदा परिक्रमा या धार्मिक यात्रेची सर्वसाधारण तयारी व पहिल्या नऊ दिवसांचा दैनंदिन कार्यक्रम याआधीच्या भागात जाणून घेतला. आता आपण ऐतिहासिक महेश्वर सोडून पुढील प्रवासास सुरुवात करणार आहोत. साधारण आपली निम्मी परिक्रमा पूर्ण झाली असे म्हणावयास हरकत नाही. चला तर मग भाविकांची उत्कंठा वाढवणार्या या यात्रेत दहाव्या दिवसापासून पुढील प्रवास कसा असेल त्याची माहिती घेऊ…..
दिवस-दहावा – महेश्वर ते नेमावर
महेश्वर ते नेमावर हा प्रवास साधारण २१५ किमी आहे. यासाठी सात-आठ तास लागतात. सकाळी नाष्टा करून भाविक आपली यात्रा सुरु करतात. मंडलेश्वर-बडवाह-खेडीघाट मार्ग नेमावर येथे पोहचतात. या प्रवासादरम्यान आपण मंडलेश्वर येथे दत्त मंदिर, श्री सदगुरु ब्रम्हचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे श्रीराम मंदिर, अमरेश्वर महादेव मंदिर, टेंबे स्वामींची कुटी आदी ठिकाणी भाविक भेट देतात. यामुळे आजच्या प्रवासातील मंडलेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. तसेच याचठिकाणी आद्य शंकराचार्य आणि मण्डनमिश्र यांची शास्रचर्चा झाली. या शास्रचर्चेत मण्डनमिश्र यांचा पराभव झाला.
तेव्हापासून हे स्थळ मंडलेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. या विविध दर्शनांमुळे नेमावर येथे पोहचण्यासाठी सायंकाळ होते. नेमावर हे नर्मदा परिक्रमेतील विशेष महत्व असलेले गाव आहे. कारण नेमावर हे नर्मदा मातेचे नाभिस्थान मानले जाते. म्हणजे नेमावर हे अमरकंटक येथील उगमस्थान ते नर्मदा नदी सागराला मिळते. त्याचा हा मध्य आहे. रेवासागर येथे रेणुका मातेचे मंदिर आहे. ही परशुरामाची जन्मभूमी आहे. नर्मदा नदी पात्रात नाभिकुंड आहे परंतु परिक्रमा करतांना येथे जाता येत नाही. नेमावर गावास पुर्वी नाभिपूर अथवा नाभापट्टन असेही म्हणत. कालांतराने त्याचे नेमावर झाले. नेमावर हे गाव अत्यंत प्राचिन असल्याने या परिसरात अनेक पुरातन वास्तू पहावयास मिळतात. सायंकाळी येथील सिद्धनाथ महादेव मंदिर परिसरात नर्मदा आरती असते. हे ऐतिहासिक मंदिर ५ हजार वर्षांपुर्वीचे असून पांडवांनी बांधले आहे.
दिवस अकरा – नेमावर ते जबलपूर
नेमावर ते जबलपूर हे अंतर ३८० किमी असून नर्मदा परिक्रमा बसने करतानाचा हा सर्वात मोठा प्रवास आहे. या प्रवासात बरेली-बरमनघाट-भेडाघाट ही गावे लागतात. जबलपूर हे मध्यप्रदेशातील एक प्रमुख शहर आहे. तसेच येथून जवळच असलेला भेडाघाट पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. जबलपूर येथील गौरीघाट येथील नर्मदा आरती पाहण्यासारखी असते. जबलपूर येथे इतरही अनेक छोटी-मोठी मंदिरे आहेत. पण परिक्रमावासियांना आता ओढ लागलेली असते. ती नर्मदा मातेच्या उगमाची म्हणजेचे अमरकंटकची.
दिवस बारा – जबलपूर ते अमरकंटक
जबलपूर ते अमरकंटक हा प्रवास २३८ किमी आहे. हा प्रवास दिंडोरी-जोगी टिकरीया अशा छोट्या-मोठ्या गावामधून करावा लागतो. अमरकंटक येथे नर्मदा नदीचा उगम असल्याने या भागातील नदीचा प्रवाह छोटा होत जातो. अमरकंटक येथे पांढरे शुभ्र वीस कळस असलेले मंदिर आपले लक्ष वेधून घेते. हेच नर्मदा मंदिर होय. खरे तर माई का बगिया याठिकाणी नर्मदेचा उगम होतो. मात्र प्रवाहाचा काही भाग भूगर्भातून वाहत याठिकाणी पुंन्हा प्रकट होतो. येथे परिक्रमावासियांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार आहे.
मंदिरात प्रवेश करताच नर्मदाकुंड अथवा कोटीतीर्थ दृष्टीस पडतं. परिक्रमावासियांनी याठिकाणी अनावधानाने नर्मदा मातेचे पात्र ओलांडू नये, म्हणून काळजी घ्यावी लागते. येथे स्नानासाठी कुंड बनवले आहे. परिक्रमा करतांना येथे नर्मदा मातेची खणा-नारळानं ओटी भरतात. तसेच आपल्या जवळचे अर्ध जल कुंडात अर्पण करतात. परत बाकी जल गोमुखातील धारेनं भरुन घेतात.
नर्मदे हर या कुंडाभोवती श्री रेवानायक, श्री अमरकंठेश्वर, श्री नर्मदेश्वर, श्री गौरीशंकर, श्री चर्तुभूज व रोहिणीदेवी मंदिरं आहेत. शेजारी भव्य सभामंडप आहे. नागपुरच्या भोसल्यांनी या कुंडाची निर्मिती केली व अहिल्यादेवी होळकरांनी या मंदिराचा जिर्णाद्धार केला. या मंदिरात परिक्रमावासियांना दररोज प्रसाद दिला जातो.
अशा प्रकारे आपली यात्रा आपण सुरु केलेल्या उद्देशानुसार नर्मदा मातेच्या उगमापर्यंत पोहचली आहे. आता फक्त ओकांरेश्वरपर्यंतचा प्रवास बाकी आहे. यापुढील प्रवास अगदी वेगळा व काही सोपा आहे. साधारणपणे अमरकंटक येथे उगमस्थानास वळसा घेतल्यापासूनच भाविकांचा उत्साह वाढत जातो. पुढील परिक्रमा करताना काय काय अनुभव येतात याबाबत आपण पुढील भागात माहिती घेऊ.
क्रमश: