घरगुती सांडपाण्याचा प्रश्न
नाशिक शहरातून वाहणाऱ्या आपल्या गोदावरीला सर्वात मोठा त्रास होतो आहे तो म्हणजे प्रदूषणाचा. प्रदूषणाचे देखील विविध प्रकार आहेत. त्यापैकी आज आपण समजून घेऊयात घरगुती सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण..
आपल्या संस्कृतीमध्ये नदीचे पाणी हे अमृत समजले जात असे. मलजल म्हणजेच सांडपाणी म्हणजे विष. त्यामुळेच पूर्वीच्या काळी गंगेत आंघोळ करण्यापूर्वी आधी डोक्यावर एक तांब्याभर थंड पाणी घेतले जात असे. जेणेकरून आंघोळ करताना नदीमध्ये लघवी होऊ नये. परंतु हे सर्व चित्र बदलले ब्रिटीशांच्या राजवटीमध्ये. डॉ. राजेंद्र सिंग एक गोष्ट नेहमी सांगतात. ती येथे उल्लेख करावीशी वाटली. १९३२ मध्ये ब्रिटीश पार्लमेंटनी बनारस शहराच्या विकासासाठी २५ लाख रुपये मंजूर केले. त्याकाळी २५ लाख रुपये ही एक फार मोठी रक्कम होती. परंतु त्यामध्ये एक अट होती. संपूर्ण बनारस शहराचे सांडपाणी एकत्र करून त्यावर प्रक्रिया करून गंगेमध्ये सोडायचे. असं होणार असेल तरच २५ लाख रुपयांचा निधी मिळणार होता. अन्यथा तो निधी परत जाणार होता. एक समिती नेमली गेली. त्यामध्ये पंडित मदन मोहन मालवीय व त्यांचे चार सहकारी होते. पंडित मदन मोहन मालवीय यांनी या संकल्पनेला विरोध केला. गंगेमध्ये कुठल्याही प्रकारचं सांडपाणी जाता कामा नये, ही त्यांची भूमिका होती. परंतु त्यांच्या सहकार्यांचं असं म्हणणं होतं की, ब्रिटीश तर आता जात आहेतच. ते देत असलेल्या निधीचा वापर करून घेऊ.
ब्रिटीश निघून गेल्यानंतर ती प्रक्रिया केंद्रे काढून टाकू. ब्रिटिश तर गेले परंतु ती प्रक्रिया केंद्र फक्त बनारसपुरता मर्यादित राहिली नाही. तर ती संपूर्ण भारतातील अनेक शहरांमध्ये झाली. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या घरातील सांडपाणी आपल्याच परसबागेमध्ये, शोष खड्ड्यांमध्ये सोडल्या जात असे. त्याचे सोनखत बनत असे….वगैरे वगैरे…
आता आपल्या नाशिक शहरात जमिनी खाली दोन प्रकारच्या जलवाहिन्या आहेत. एक म्हणजे सांडपाणी वाहून नेण्यासाठीची आणि दुसरी पुराचे पाणी वाहून नेण्याची. सांडपाणी वाहून नेण्याच्या जलवाहिनीचा उद्देश शहरातील सर्व सांडपाणी हे प्रक्रिया केंद्रापर्यंत पोचवणे. तर, पुराच्या जलवाहिनीचा उद्देश आहे तो पुराचे पाणी नाल्यांमध्ये, उपनद्यांमध्ये आणि गोदावरी मध्ये पोचवणे. इथे समस्या थोडी वेगळी आहे. सांडपाण्याची जलवाहिनी चोकअप झाली तर ते सांडपाणी पुराच्या पाईप मध्ये घुसवून टाकलं. जे सरळ सरळ नाले, उपनद्यांमधून थेट गोदावरी मध्ये येते. उलट देखील केले आहे. ते म्हणजे सांडपाण्याच्या जलवाहिनीत पुराचे पाणी घुसवली आहे.
परिणामी थोडा जरी पाऊस झाला तरी आपल्याला नदीतील चेंबर फुटणे, त्यांची झाकणे उडणे असे दिसते. त्यामुळे शंभर टक्के सांडपाणी हे प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचतच नाही. सांडपाण्यामुळे नदीमध्ये पण वेली तयार होतात. ते पाणी जमिनीत मुरून भूजल स्त्रोत देखील प्रदूषित होतात. संपूर्ण जैवविविधताच धोक्यात येते. तसेच पावसाचे पाणी सांडपाण्याच्या जलवाहिनीमध्ये घुसले तर एक समस्या तयार होते. ती म्हणजे, त्या चेंबरची पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता नसल्यामुळे ते फुटतात. त्यातील सांडपाणी हे देखील नदीला प्रदूषित करते.
प्रक्रिया केंद्राबद्दल बोलायचं ठरलं तर पूर्वीच्या काळी नद्या बारमाही वाहत्या होत्या. त्या अनुषंगाने प्रक्रिया झालेल्या पाण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्डाने काही मानके आखून दिली होती. प्रक्रिया केंद्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा BOD लेव्हल म्हणजेच बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड (जलचर जीवांना जगण्यासाठी आवश्यक असलेली ऑक्सिजनची मागणी) ही 30mg/ltr पेक्षा जास्त नसावी आणि DO (म्हणजे पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन)ची मर्यादा 5mg/ltr पेक्षा अधिक असावी असे होते.
आता समस्या मोठी झाली आहे. आपली गोदावरी आणि देशातील जवळपास अनेक नद्या बारमाही राहिल्या नाहीत. आता या नद्या धरणातून पाणी सोडलं की वाहते. आणि 30 BOD चे प्रक्रिया केलेले पाणी रोज 24 तास, 365 दिवस नदीत सोडले जाते. बरं ह्या 30 BOD लेव्हलचे पाणी “Unfit for Human consumption and dangerous to health” म्हणजे मानवी वापरास अनफिट आणि स्वास्थ्यास घातक आहे, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळच म्हणते. हेच “प्रक्रिया” केलेले पाणी गोदावरीचे आणि देशातील सर्वच शहरांमधून वाहणाऱ्या नद्यांचे सर्वात जास्त प्रदूषण करते आहे. छोट्या छोट्या गटारी प्रदूषण करतांना दिसतात पण त्यापेक्षा कैक पटीने हे प्रदूषण आहे. या समस्येवर नेमका उपाय काय आहे हे आपण पुढल्या लेखात जाणून घेऊ…