चांदवड – जुन्या व नव्या व्यापाऱ्यांच्या आपापसातील वादामुळे गेल्या ११ जानेवारीपासून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या लिलावाची प्रक्रिया थांबलेली असून संबंधित बाजार समितीने कांद्याचे लिलाव विनाअडथळा तात्काळ सुरू करावे. यासाठी आज जिल्हा उपनिबंधक नाशिक यांना महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिले आहे. व्यापाऱ्यांच्या आपापसातील वादामुळे बाजार समितीचे कामकाज अघोषितपणे बंद असून चांदवड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कांदा विक्रीसाठी मोठी गैरसोय होत असून जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी स्वतः या प्रकरणी लक्ष घालून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, सचिव व महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या दालनात तात्काळ बैठक घेऊन बाजार समितीत कांद्याचे लिलाव त्वरित सुरू करावे यासाठी आदेश द्यावेत अन्यथा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी असे आव्हान महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिघोळे यांनी यावेळी केले. निवेदनावर नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे कार्यकारणी सदस्य नाना काकड यांच्या सह्या आहेत.